शिर्डी : शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया, गोचीड तापासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून महिनाभरात डेंग्यूसदृश आजाराने तिसरा बळी घेतला आहे़ शिर्डीत मोठ्या प्रमाणावर फैलावलेल्या रोगांवर नियंत्रण मिळवण्याबाबत प्रशासन फारसे गंभीर दिसत नसल्याने प्रशासनाला आणखी किती बळी हवे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे़ दरम्यान, या आजाराच्या फैलावाला जबाबदार असलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जबाबदार धरत येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भुजबळ यांनी नगरपंचायत विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा अर्ज शिर्डी पोलिसात अर्ज दिला आहे़शनिवारी अनू अजय सोनी ही आठ वर्षांची बालिका डेंग्यूसदृश आजाराने मृत्यूमुखी पडल्याची माहिती नगरसेविका वैशाली वेणूनाथ गोंदकर यांनी दिली आहे़ श्रीरामनगर भागातील ही मुलगी असून गेल्या पंधरवाड्यातही या भागातील शगुप्ता कुरेशी या दहावीतील मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे़ याशिवाय येथे आणखी एक महिलाही दगावल्याचे सांगण्यात येते़ याबाबत मलेरिया विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन डास नियंत्रणासाठी प्रबोधन करत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी ते खरे नसल्याचा आरोप गोंदकर यांनी केला आहे़ (तालुका प्रतिनिधी)
शिर्डीत डेंग्यूचा तिसरा बळी?
By admin | Updated: September 18, 2016 01:50 IST