अहमदनगर : ‘साहेब, आम्हाला काही बोलायचंय...अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन दिल्यानंतर मराठा क्रांती महामोर्चामधील युवतींनी त्यांना विनंती केली. हो..हो..बोला..बोला, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणताच मग या युवतींनी निवेदनातील मागण्यांवर मनोगत सुरू केलं.’चाँदणी चौकात मोर्चेकऱ्यांसमोर काही युवती झंझावाती भाषणं करीत होत्या. तेव्हाच निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे यांच्यासमवेत काळे टी शर्ट व जिन्स पँट अशा पेहरावातील किरण गणेश गव्हाणे, लोकिता सुधीर साठे, सायली विजय चितळे, सिद्धी संजय शिंदे, वृषाली मच्छिंद्र कोहोक, अनुराधा लक्ष्मीकांत बेरड, ऐश्वर्या आजबे, माधवी काकडे या आठ युवती जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धडकल्या. निवेदन कधी देणार? म्हणून पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची चलबिचल सुरू होती. चाँदणी चौकातील भाषणांचा घणाघाती आवाज थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येत होता. भाषणं संपली. राष्ट्रगीताचा आवाज ऐकताच जिल्हाधिकारी कक्षातील सारे जण राष्ट्रगीतासाठी शांत उभे राहिले. ठरल्याप्रमाणे राष्ट्रगीत संपताच या युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात निवेदन घेऊन प्रवेश केला. जिल्हाधिकारी त्यांची वाटच पाहत होते. जिल्हाधिकारी कवडे यांना लाखो सकल मराठा मोर्चेकऱ्यांच्या वतीने या युवतींनी सविस्तर मागण्यांचे १५ पानी निवेदन दिले. त्यानंतर निवेदनातील एकेका मागणीचे या युवतींनी थोडक्यात विवेचन केले. ते ऐकून घेतल्यानंतर कवडे यांनी आपले निवेदन सरकारकडे पाठवून आपल्या भावना कळविण्यात येतील, अशी ग्वाही मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधी युवतींना दिली. त्यावर साहेब, आपण आम्हाला वेळ दिला, आपल्यासमोर दोन शब्द बोलण्याची संधी दिली, आमचे म्हणणे ऐकून घेतले, त्याबद्दल आभार...जय जिजाऊ...जय शिवराय. असं म्हणत दोन्ही हात जोडून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोखंडी प्रवेशद्वारासमोर या मुलींना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या मुलींनी प्रवेशद्वारासमोर येऊन छोटेखानी भाषण केलं अन् त्या पुन्हा आत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसल्या.
साहेब, आम्हाला काही बोलायचंय...
By admin | Updated: September 24, 2016 00:11 IST