अकोले : आढळा धरणातून मंगळवारी सकाळी सहा वाजता रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणात सध्या ९९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. संगमनेर, अकोले व सिन्नर तालुक्याच्या लाभक्षेत्रातील १६ गावांना रब्बी पिकांसाठी दोन आवर्तने सोडण्याचा जलसंपदा विभागाने निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी धरणाच्या उजव्या कालव्यातून ६८ क्यूसेक, तर डाव्या कालव्यातून ४२ क्यूसेक वेगाने पाणी लाभक्षेत्राच्या दिशेने झेपावले. जवळपास ३४-३६ दिवस चालणाऱ्या या आवर्तनातून ३५० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येणार आहे. रब्बीसाठी २ हजार १९० हेक्टर शेतजमीन धारक शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज दाखल झाले आहेत. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त ३ एकर क्षेत्रास पाणी घेता येणार आहे. प्रति एकरी ३ तास याप्रमाणे पाण्याचे वाटप होणार आहे. अगस्ती साखर कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सहकार्याने कालव्यांची साफसफाई करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना समन्यायी मिळणारे पाणी त्यांच्या बांधापर्यंत पोहचावे म्हणून २ शाखा अभियंता, ५ कालवा निरीक्षक व २० पाट कर्मचाऱ्यांचा ताफा पाणी चोरीवर लक्ष ठेवून आहे. (तालुका प्रतिनिधी)
आढळा धरणातून रब्बीचे आवर्तन
By admin | Updated: December 15, 2015 23:15 IST