पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येत असलेल्या धमक्यांचा राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निषेध केला. दरम्यान अशा भ्याड धमक्यांचा निषेध करण्यासाठी ९ मे रोजी गाव बंद ठेवून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला. हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी अण्णा हजारे उपस्थित होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयसिंग मापारी हे होते. सुरेश पठारे, लाभेष औटी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारे यांना वारंवार येणार्या धमक्यांचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दात ग्रामसभेत निषेध व्यक्त केला. ९ मे रोजी गाव बंद ठेवून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला. रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी खर्डा येथील दलित तरुणाच्या हत्येसंबंधी हजारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला. राळेगणसिद्धी येथील उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते महेंद्र गायकवाड व शांताराम जाधव या दलित कार्यकर्त्यांनीही मंत्री राऊत यांचा निषेध केला. (तालुका प्रतिनिधी) बेजबाबदार वक्तव्य थांबवा हजारे यांनी राळेगणसिद्धीतील दलितांसाठी काय केले हे मंत्री राऊत यांनी येऊन पहावे. अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करून लोकांची दिशाभूल व समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नये. राळेगणसिद्धीत गेली ३५ वर्षे दलितांच्या बैलांना बैलपोळ्याचा मान देण्यात येतो. सामुदायिक विवाह सोहळे, दलितांच्या शेतावरील कर्जाची सवर्णांच्या श्रमदानातून फेड असे अनेक आदर्श उपक्रम राळेगणसिद्धीने हजारे यांच्या नेतृत्वाखाली घालून दिले आहेत, असेही शांताराम जाधव यांनी यावेळी सांगितले.
राळेगणसिध्दी ग्रामसभेत निषेध
By admin | Updated: February 23, 2023 07:45 IST