शेवगाव : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाईची रक्कम द्यावी, अन्यथा ३ मार्चला अनुदानापासून वंचित राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांसह कोविड आजाराच्या संदर्भातील नियम पाळून ग्रामविकासमंत्री यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा जनशक्ती विकास आघाडीने दिला आहे.
जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी शनिवारी पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन पाठविले आहे..? यंदावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान शेवगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे..? त्या अनुषंगाने पालकमंत्री या नात्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पीकपाहणी करण्यासाठी शेवगाव तालुक्याची निवड आपण केली होती. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवून शेतकरीबांधवांची दिवाळी गोड करू. मात्र, तालुक्यातील चाळीसहून अधिक गावांतील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी तर आपण गोड करू शकला नाहीत, पण आता होळीचा सण तरी गोड करा. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ५२ गावांना अनुदान प्राप्त झालेले असून उर्वरित गावांसाठी अनुदानाची रक्कम जानेवारी महिन्यात तालुक्याला प्राप्त झाली. ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आली नाही. प्रशासन कशाच्या प्रतीक्षेत आहे..? शेतकऱ्यांना का वेठीस धरले जात आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे..