अहमदनगर: विकासाचे स्वप्न दाखवत भाजपाने नगर जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलविले. भाजपाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात बदल घडविण्याची हमी देऊ लागले असून, विकास कामांच्या याद्या तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. मात्र जिल्हा नियोजनकडे अवघा २0 टक्के निधी शिल्लक आहे. त्यामुळे नवीन आमदारांना विकास कामांसाठी आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्य शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत, असा या योजनांचा प्रवास असतो. आघाडी सरकारने ग्रामीण विकासासाठी तब्बल १६६ जिल्हास्तरीय योजना मंजूर केल्या. त्यासाठी शासनाने चालू आर्थिक वर्षात नगर जिल्ह्यासाठी १६८ कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी मे अखेर १२२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला. वितरीत झालेल्या निधीपैकी गेल्या सात महिन्यांत ९८ कोटी ८0 लाखांचा निधी खर्च झाला आहे. याचाच अर्थ पुढील पाच महिन्यांसाठी अवघा २0 टक्केच निधी शिल्लक राहिला आहे. उपलब्ध निधीतून जिल्ह्याचे विकासाचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी निधी अपुरा पडणार असून, नवीन पालकमंत्र्यांची निवड होईल. परंतु निधीअभावी त्यांना महत्वाचे निर्णय घेणे शक्य होणार नसल्याचे यावरून दिसते.
राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. पालकमंत्री निवड होईल, असे गृहीत धरून नियोजनाच्या निधीचा आढावा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी घेतला. त्यामध्ये जिल्हा नियोजनकडे २0 टक्के निधी शिल्लक असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना नियोजनमधून अत्यंत कमी निधी मिळणार आहे. नियोजन समितीतून अधिकाधिक निधी आघाडीच्या नेत्यांनी खर्च केला. त्यामुळे निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न नवीन सदस्यांना भेडसावणार आहे. (प्रतिनिधी)
■ कृषी, वन, सहकार, ग्रामविकास,जलसंधारण, जलसंपदा, ऊर्जा, उद्योग, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, गृह, पर्यटन, सांस्कृतिक आदी विभागाच्या योजना आहेत.
विकास कामांवर र्मयादा
■ नियोजनचा मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे पाच महिन्यांत विकास कामे करण्यावर र्मयादा येणार आहेत. निधी अपुरा असल्याने मतदारसंघातील विकास कामे होणार नसल्याचे दिसते.
कुणाला बसणार फटका
■ शेवगाव- आ. मोनिका राजळे, नेवासा- आ. बाळासाहेब मुरकुटे, कोपरगाव-आ. स्नेहलता कोल्हे, श्रीगोंदा- आ. राहुल जगताप आणि नगर शहर- आ. संग्राम जगताप.