लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : गावची निवडणूक लागली की प्रचाराचा धुरळा, बॅनरबाजी, आरोपांच्या फैरी, जेवणावळी आणि गटातटातली भांडणे या दर पाचकीतल्या नित्याच्या गोष्टी. त्याला कंटाळून यावर्षी अनेक गावांनी बिनविरोध निवडणुकीचा मार्ग धरला. अनेक ग्रामपंचायतींचा बिनविरोधचाही मोठा इतिहास नगर जिल्ह्यात आहे. अशा बिनविरोध गावांमध्ये निवडणूक लागताच यावर्षी नुस्ता धिंगाणा उभा राहिला. मात्र, याला अपवाद ठरले ते हिवरेबाजार! हिवरेबाजारमध्ये ३५ वर्षांनंतर निवडणूक लागली. मात्र, गावात ना भोंगा वाजला, ना बॅनर लागला, ना जेवणावळी उठल्या. उमेदवारांनी साध्या पद्धतीने प्रचार करीत विकासाच्या मुद्यावर मत मागितले.
हिवरे बाजार (ता. अहमदनगर) हे राज्याच्या आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे गाव. या गावात १९८५ नंतर प्रथमच निवडणूक लागली. हिवरे बाजारचे माजी सरपंच उत्तमराव संबळे यांचे चिरंजीव प्रा. किशोर संबळे यांनी पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनेल उभे केले. पॅनेलच्या प्रचारासाठी त्यांनी सर्व परवानग्या घेतल्या. घरोघर जाऊन प्रचार केला. गावातून रॅली काढून संबळे यांनी प्रचाराची सांगताही केली. मात्र, या सर्व प्रचारात त्यांनीही कोणावर थेट आरोप केले नाहीत. सत्ताधारी पोपटराव पवार यांच्या पॅनेलकडून तर साधी रॅलीही काढली गेली नाही. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी फक्त घरोघर जाऊन विकासाच्या मुद्यावर मते मागितली. प्रचाराची साधी गाडीही गावात फिरविली नाही.
.............
निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा भाग आहे. यावर्षी गावात निवडणूक लागली. पण ही निवडणूकही आम्ही आदर्श पद्धतीनेच करण्याचा चंग बांधला होता. आम्ही घरोघर जाऊन विकासाच्या मुद्यावर मत मागितले. कोठेही बोर्ड लावला नाही. प्रचाराची गाडी फिरविली नाही. कोणावरही आरोप केले नाहीत. त्यापासून आम्ही सर्वजण अलिप्त राहिलो.
-पोपटराव पवार, हिवरेबाजार
............
आम्ही घरोघर फिरून प्रचार केला. गावातून रॅली काढून प्रचाराची समाप्ती केली. माझे वडील सरपंच होते. म्हणून मीही निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. त्यासाठी सर्व सात जागांवर उमेदवार दिले आहेत. प्रचारात आम्ही कोणावरही आरोप केलेले नाहीत. फक्त आमची भूमिका मतदारांसमोर मांडली.