अहमदनगर : नगरचे राजकारण अतिशय गढूळ झाले आहे. माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचा काळ नगरच्या इतिहासात सुवर्णकाळ होता. बार्शीकर यांच्या विकास पर्वाची पुनरावृत्ती करण्यासाठी नगरमध्ये एक सशक्त दबाव गट हवा आहे, अशी अपेक्षा माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केली.
नवनीत विचार मंचातर्फे स्व. बार्शीकर यांच्या जयंती व जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. त्यावेळी निमसे बोलत होते. प्रारंभी डॉ. निमसे, विचार मंचाचे अध्यक्ष सुधीर मेहता, सुभाष मुथा यांनी बार्शीकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी इंजिनिअर अमृत मुथा, आर्किटेक्ट असोसिएशनचे अर्शद शेख, रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर, जागरूक मंचाचे सुहास मुळे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, सुशील शाह, जनार्दन शिरसाठ, डॉ. कमर सुरुर, श्रीमती बागडे, राजन नवले, महावीर पोखरणा, अबिद खान आदींची उपस्थिती होती.
मेहता यांनी शताब्दी समितीच्या अध्यक्षपदासाठी डॉ. निमसे यांच्या नावाची सूचना केली. त्याला मुथा यांनी अनुमोदन दिले. भाईंची उपेक्षा करणाऱ्यांना आता नगरकर कृतघ्न पालिका पुरस्कार देतील, असे सांगितले. यावेळी सर्व संस्था, संघटना एकत्र आल्या तरच भाईंची स्मृती जपण्याचा उद्देश सफल होईल. प्रत्येकाने आपल्या घरावर नवनीत नगर आणि शहरात कृतज्ञता फलक लावावेत. गौरव ग्रंथासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सुशील शाह, श्रीराम जोशी, जनार्दन शिरसाठ, किशोर मुनोत, सायली मेहता आदींनी केले. श्रीराम जोशी यांनी आभार मानले.
--
फोटो- १३ बार्शिकर
माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सुधीर मेहता आदी.