अहमदनगर : जून २०२० नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व्हे करण्यात आलेल्या स्थलांतरित विद्यार्थ्यांची चुकीची माहिती सादर झाल्याचा संशय असून त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कामचलावू प्रवृत्तीमुळे शिक्षण हक्क कायदा केवळ कागदावर असल्याचा आरोप जि. प. सदस्य तथा भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. ऊसतोडणी मजूर, खाणकामगार, वीटभट्टी कामगार आणि इतरही स्थलांतरित मजुरांच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षी शिक्षण विभाग सर्वेक्षण करुन वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देतो. चालू वर्षीच्या सर्वेक्षणात जिल्हाभरात तालुकानिहाय एकत्रित मिळून ९०० विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले आणि १३५ विद्यार्थी स्थलांतरित होऊन गेले, अशी माहिती मिळाली. ही माहिती कामचलावू आणि घाईघाईने केली असल्याचा संशय असून विद्यार्थी आणि कष्टकरी पालकांवर अन्याय करणारी आहे.
वास्तविक जिल्ह्यातील साखर कारखाने, वीटभट्टी, खाणी आणि इतरही ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असून ती हजारोंच्या संख्येत असेल. मग या मजुरांचे स्थलांतरित विद्यार्थी इतके कमी कसे, हा प्रश्न आहे. याचाच अर्थ शिक्षण विभागाने केलेली पाहणी बोगस असून अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. याबाबत आपण बारकाईने चौकशी करुन वंचित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचेही वाकचौरे यांनी म्हटले आहे.
----------------------------------------