अहमदनगर : देशाची अर्थव्यवस्था विकसित व्हायची असेल तर त्यासाठी औद्योगिकीकरण महत्त्वाचे आहे. उद्योग हा त्याचा आत्मा आहे. नगर शहरातील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात एक-दोन बैठका घेण्यात येतील, असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून अहमदनगर एमआयडीसीतील उद्योजकांची शनिवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, आमी संघटनेच्या पदाधिकारी, सदस्य असलेल्या उद्योजकांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, आमदार डॉ. सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, मच्छिंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.
या विशेष बैठकीमध्ये उद्योजकांनी अनेक प्रश्न मंत्री थोरात यांच्यासमोर मांडले. ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणा असून एकाच वेळेला दुहेरी कर आकारला जातो. यापैकी एका कराची आकारणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उद्योजक यांच्या वतीने करण्यात आली. पाईपलाईन जुनी झाल्याने वारंवार फुटते. नगर-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज आहे. एमआयडीसी परिसरामध्ये असणारे ट्रक टर्मिनल मंजूर झाल्यास त्याची उद्योजकांना मदत होईल, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावेळी थोरात म्हणाले, यातील काही मागण्या राज्य स्तरावरील असल्याने शासन म्हणून त्याचा पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी बैठकांचे आयोजन निश्चितपणे केले जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून मार्गी लावण्यात येतील. सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना उद्योजकांच्या मागण्या संदर्भात लेखी सूचना करणार आहे. त्याचा पाठपुरावा देखील करणार आहे.
----------
फोटो- १०एमआयडीसी
एमआयडीसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकांच्या बैठकीत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. समवेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे, उद्योजक संघटनेचे पदाधिकारी.