घारगाव : गुजरातहून नाशिक-पुणे महामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात अपघात झाला. यात चालक जखमी झाला. हा अपघात रविवारी ( दि. २३) सकाळी साडे सात वाजता घडली. यात वाहनाचे व आंब्याचे नुकसान झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात तीव्र वळण असल्याने अनेकदा वाहन चालकांचे वाहनांवरील ताबा सुटून अपघात झालेले आहेत. महामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणारी बोलेरो पिकअप (एम.एच.१४ जे.एल.०३८७) संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात आली असता चालक मनोज गोविंद साठे याला घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा पिकअपवरील ताबा सुटला व पिकअप महामार्गावर उलटली. यात चालक मनोज साठे किरकोळ जखमी झाला. आंबे महामार्गाच्या लगत पडले. आंब्यांचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण ढोकरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, भरत गांजवे आदींनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.