यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. जय भोसले व वासुदेव महाराज खेडकर आदी उपस्थित होते. कुलकर्णी यांनी सांगितले की, पंढरपूरच्या वारीबाबत सरकारने वारकऱ्यांना चर्चेला बोलावून दिशाभूल केली आहे. वारीला निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी मध्येच ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले, ही चुकीची बाब आहे. वारीची परंपरा ही मुघल व इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नव्हती. सध्या सर्वत्र जनजीवन सामान्य होत आहे. हॉटेल, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठ, लग्नसमारंभ सुरू आहेत. अशा परिस्थितीत सरकारने वारकऱ्यांशी संवाद साधून काही नियम घालून वारीला परवानगी द्यावी. सकाळी प्रवासात अडचणी असल्यास वारकरी वारीचा रात्रीचा प्रवास करतील, तसेच कोरोना संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावात न जाता माळरानावर मुक्काम करतील. ही मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी १७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेच्या मार्गाने भजन दिंडी घेऊन जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच आषाढी एकादशीपासून विविध धार्मिक ठिकाणी चातुर्मास, पारंपरिक उत्सव, सप्ताह, प्रवचने आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होतात. यावरील बंधने सरकारने दूर करावीत. सरकारने वारकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर दूर कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही, असा इशारा यावेळी कुलकर्णी यांनी दिला. खेडकर महाराज यांनीही सरकारने नियम घालून देत वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी केली.
किमान दोन वारकऱ्यांना पंढरीची वारी करू द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST