अहमदनगर : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून जि.प. पदाधिकारी, सदस्यांनी प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीत शिक्षक संघटना स्तब्ध राहिल्या. मात्र, तालुकास्तरावर झालेल्या ‘गुरूजी’च्या बदल्यात मोठ्या प्रमाणात असमानता असल्याची तक्रार शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे केली. त्यावर बिनवडे यांनी पुढील वर्षी शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी रंगीत तालीम घेण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांची गुरूवारी जिल्हा परिषदेत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी बिनवडे बोलत होते. शिक्षणाधिकारी अशोक कडूस, मुख्य वित्त लेखा अधिकारी अरूण कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांच्यासह शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, संजय धामणे, राजेंद्र निमसे, रा.या. औटी, आबा जगताप, संजय शेळके , श्रीराम सावंत यांच्यासह अन्य शिक्षक नेते उपस्थित होते. शिक्षण विभाग शिक्षकांच्या बदल्या नियमाप्रमाणे झाल्याचा दावा करत असला तरी त्यात मोठ्या प्रमाणात अनियमिता आहे. अशा परिस्थितीत शिक्षक संघटना शांत असल्याचे कळमकर यांनी बिनवडे यांच्या निदर्शनास आणून दिले. तालुकास्तरावर प्रत्येक गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वेगवेगळे नियम लावून बदल्या केल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर बिनवडे यांनी पुढील वर्षी अत्यंत पारपदर्शीपणे शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आश्वासन दिले. यासाठी रंगीत तालीम घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एबीएल हा शिक्षण विभागाच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प फसला आहे. गेल्या वर्षी २४६ शाळा या प्रकल्पासाठी निवडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या ठिकाणी प्रकल्पाला प्रतिसाद मिळाला नसल्याचा सूर शिक्षकांनी आवळला. तसेच एबीएलचे साहित्य वापरण्यास शिक्षकांना परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर कडूस यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात शिक्षकांना स्वत:ची अध्ययन पध्दती वापरण्यास मुभा असल्याने एबीएलचे साहित्य शिक्षकांना वापरता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
गुरुजींच्या ‘बदल्यां’ची होणार रंगीत तालीम
By admin | Updated: July 1, 2016 00:30 IST