अहमदनगर : यंदाच्या भरपूर पावसामुळे सगळीकडे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. त्यामुळे नगर बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर घसरले असून, सर्वसामान्य गृहिणींसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. ठोक बाजारात फ्लाॅवर चार रुपये, कोबी सात रुपये, तर पालक आणि कोथिंबीर तीन ते पाच रुपयांना जुडी, असा भाव आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एकही पालेभाजीची जुडी दहा रुपयांच्या वर नाही, तर एकही भाजी २० रुपये किलोच्या पुढे नसल्याचे दिसते आहे.
यंदा भरपूर पाऊस झाला. जलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांचे उत्पादन घेतले. ऐन हिवाळ्यात पालेभाज्यांचे उत्पादन वाढल्याने बाजारातही आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आपोआप कोसळले आहेत. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्या आहेत. आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत, असे बाजार समितीचे व्यवस्थापक अभय भिसे यांनी सांगितले.
------------
भाज्यांचे ठोक सरासरी भाव (रुपये प्रतिक्विंटलमध्ये)
टोमॉटो १,६००
वांगी ७५०
फ्लाॅवर ४००
कोबी ७५०
काकडी ५००
गवार ५,५००
घोसाळे १,६५०
दोडका २,०००
कारले २,०००
भेंडी २,२५०
वाल १,५००
बटाटे ३,१५०
हिरवी मिरची २,२५०
लिंबू ७५०
वटाणा ३,१००
कांदा १,७५०
-----------------
पालेभाज्यांचे ठोक भाव (रुपये प्रतिशंभर जुडी)
मेथी ४००
कोथिंबीर ३००
पालक ५००
करडी भाजी ५००
शेपू ४००
-------------
मोसंबी ३५ रुपये किलो, तर संत्रा १७ रुपये किलो
फळांचे भावही कमी झाले आहेत. अहमदनगरच्या बाजार समितीमध्ये रविवारी फळांचे ठोक भाव असे होते. (रुपये प्रतिक्विंटलमध्ये) मोसंबी (३,५००), संत्रा (१,७५०), डाळिंब (७,०००), पपई (५५०), सीताफळ (३,०००), बोरं (१,२५०), चिकू (२,५००), सफरचंद (५,०००), चमेली बोरं (७५०), असे दर होते.