बाभळेश्वर (अहमदनगर) : पावसाअभावी यंदा खरिपाच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत़ उशीरा पाऊस झाल्याने अनेक भागात उशीरा पेरण्या झाल्या़ त्यामुळे अनेक शेतकरी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते़ उशीरा पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेत सहभाग घेता यावा, यासाठी विमा योजनेची दुसऱ्यांदा मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़खरीप हंगामातील पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळून तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येते़ या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत विमा रक्कम भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आली होती़ मात्र यावर्षी पावसाचे आगमन उशीरा झाल्याने वेळेत पेरण्या होऊ शकल्या नाहीत़ उशीरा पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती़ ज्या शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत १६ आॅगस्टपर्यंत सहभागी होता येणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा आधार घेता येईल, असे विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)
पीक विम्याला मुदतवाढ
By admin | Updated: August 1, 2014 00:23 IST