घारगाव (अहिल्यानगर): संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा, घारगाव परिसरात रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, असे भू-वैज्ञानिकांनी सोमवारी सांगितले. भूकंपामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव, बोटा, माहुली, नांदूर खंदरमाळ, बोरबन, कोठे आदी परिसरात यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेत त्याची नोंद झाली होती. त्यावेळी घारगाव परिसरात भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील मेरी संस्थेचे शास्त्रज्ञ, संगमनेरचे तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी नागरिकांना भेट दिली होती.
रविवारी झालेल्या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापन यंत्रात झाली असून, त्याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली आहे.