जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही पंचायत समित्या, कर्जत नगरपंचायत तसेच जामखेड नगरपरिषद यांच्या नियोजनातून होणाऱ्या घरकुल योजनांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे गृहनिर्माण अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन घरकुल योजनांमधील तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गृहनिर्माण कार्यालयात पार पडलेल्या पहिल्या बैठकीत राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख राजाराम दिघे यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, दिलीप जाधव, जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, सूर्यकांत मोरे उपस्थित होते.
आ. पवार यांनी ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेबाबत येत असलेल्या अडचणी उपस्थित केल्या. या योजनेंतर्गत ‘ड’ यादीत अनेक लाभार्थी कुटुंब होती. मात्र सर्वेक्षणात अनेक चुकीच्या घटकांची नोंदणी करताना अनेक लाभार्थी कुटुंब वगळण्यात आले. वाहने, टेलिफोनसारख्या सुविधांचा सर्वेक्षणात समावेश करून कुटुंबांना अपात्र करण्यात आले. अशा कुटुंबांना पात्र करण्यासाठी ऑनलाइनला स्वतंत्र विंडो मिळावी, वगळलेल्या लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्यात यावे, शासनस्तरावरून याबाबत फेर सर्वेक्षण करण्यात यावे, ज्या कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा कुटुंबांना यशवंत मुक्त वसाहतमध्ये समूहाने घरकुल बांधण्यास जागा उपलब्ध करण्यात यावी, अशा विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुनील जाधव, कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते. कर्जत नगर पंचायतीकडे सध्या रमाई योजनेसाठी २४९ नागरिकांचे अर्ज दाखल झाले. प्रत्येकी अडीच लाखांचा निधी नगरपंचायतकडे लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे घरकुल योजनांच्या अडचणींचा तिढा आता लवकरच सुटणार आहे.
.............
गोरगरीब, गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले. अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतानाही त्यांना सुविधेच्या चौकटीत बसवून अपात्र करण्यात आले होते. मात्र अशा कुटुंबांचे काही अंशी निकष बदलून त्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड