अहमदनगर : देशातील पाच पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे़ या प्रकल्पांत नगर शहरातील भुईकोट किल्ल्याचा विचार केला जाणार असून, या किल्ल्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़केंद्रीय पर्यटनमंत्री नाईक नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या़ त्यापूर्वी त्यांनी खा़ दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला़ नाईक म्हणाले, केंद्र शासनाने पर्यटन विकासासाठी ५०० कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे़ या निधीतून पहिल्या टप्प्यात ५० प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ पहिल्या पाच प्रकल्पांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे़ नगर शहराच्या पर्यटन विकासासाठी खा़ गांधी यांनी एक हजार १०० कोटींचा प्रस्ताव केंद्राला सादर केला आहे़ या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार केला जाईल़ येथील ऐतिहासिक भुईकोट किल्लयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल़ तसेच किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ शहरातील ऐतिहासिक स्थळांपासून ३०० मीटरच्या आत कुठेही नवीन बांधकाम करण्यास परवानगी नाही़ त्यामुळे शहरात नवीन इमारती उभ्या राहत नाही आणि जुन्या इमारती धोकादायक झाल्या आहेत़ त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याची बाब यावेळी नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली़ याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ (प्रतिनिधी)रणगाडा संग्रहालयास भेटसकाळी विशाल गणपतीचे दर्शन घेऊन नाईक यांनी शहरातील भुईकोट किल्ल्यास भेट दिली़ रणगाडा संग्रहालयाची पाहणी केली़ संग्रहालयातील दुर्मीळ वस्तुंबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले़
भुईकोटला राष्ट्रीय दर्जा
By admin | Updated: July 26, 2014 00:33 IST