अहमदनगर : वस्ती-शेतीवर राहणारे, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे, यापूर्वी ज्यांच्यावर हल्ले झाले आहेत,अशांनी स्वसंरक्षणासाठी तसेच बँका, पतसंस्था, खासगी संस्थांनी संरक्षणासाठी शस्त्र परवाने घेतले आहेत. एप्रिल-२००६ मध्ये जिल्ह्यात फक्त ५४ शस्त्र परवाने होते, हीच संख्या आता अनेक पटींनी वाढली असून जिल्ह्यात तब्बल ४ हजार ८१९ शस्त्रधारक आहेत. वर्षभरात दीडशे ते दोनशे जणांचे अर्ज येत असून त्यापैकी ७५ टक्के अर्ज नाकारले जात आहेत. स्वसंरक्षणापेक्षा प्रतिष्ठेसाठी शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शस्त्र वापरण्याबाबत निष्काळजीपणा होत असल्याने ही शस्त्रं स्वसंरक्षणासाठी की दुसऱ्याचा घात करण्यासाठी आहेत, अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेत रविवारी सहकार सभागृहाबाहेर रिव्हॉल्वरमधून गोळी सुटल्याने झालेल्या घटनेमुळे रिव्हॉल्वरच्या निष्काळजीपणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. स्वसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगणाऱ्यांच्या संख्येमध्ये गेल्या दहा वर्षात भूमितीय पद्धतीने वाढ झाली आहे. एप्रिल २००६ मध्ये जिल्ह्यात केवळ ५४ शस्त्र परवाने होते. त्यावेळी वर्षाला शंभर अर्ज यायचे. आजही शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्जांची संख्या वाढली आहे. वर्षाला दोनशेपेक्षा जास्त अर्ज येत असून त्यापैकी केवळ २५ टक्के अर्जच मंजूर केले जात आहेत. तरीही शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून ती तब्बल ४ हजार ८१९ इतकी झाली आहे. यामध्ये बंदूक, रायफल, पिस्तूल आणि रिव्हॉल्वर यांचा समावेश आहे. बँका, पतसंस्था, खासगी संस्था, आर्थिक उलाढालीची केंद्र यांच्याकडे परवाने आहेत. स्वसंरक्षणासाठी घेत आलेल्या शस्त्रांची संख्या ९५ टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोणाला मिळतो परवानाभारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे (आर्म अॅक्ट) नुसार शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली जाते. परवाना प्राधिकरणाने मंजूर केल्यानंतर, तसेच संरक्षण, खेळ यासाठी २० इंचापेक्षा कमी नाही, इतक्या लांबीची नळी व बिनआट्याची पोकळी असलेल्या बंदुकीबाबत किंवा खरोखर पीक संरक्षणासाठी वापरावयाच्या, तोंडाकडून ठासलेल्या बंदुकीबाबत,भारताच्या नागरिकाने मागितल्यास त्याला परवाना दिला जातो. तोंडाकडून ठासावयाची बंदूक पीक संरक्षणासाठी पुरेशी नाही, अशी खात्री झाल्यास बिनआट्याची पोकळी असलेल्या अन्य कोणत्याही बंदुकीच्या संबंधात परवाना देता येतो. नेमबाजीच्या सरावासाठी पॉर्इंट २२ बोअर रायफलीबाबत परवाना मिळतो. तसेच शस्त्र परवाना मागण्याचे सबळ कारण दिल्यास त्यालाही परवाना दिला जातो. कोणाला नाकारला जातोमनाई केलेल्या शस्त्रांसाठी,शस्त्रे बाळगण्यास मनाई केलेली असताना, विकल मनाच्या व्यक्तीला, व्यक्ती अयोग्य असल्याचे प्राधिकरणाचे मत झाल्यास, सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्यास परवाना नाकारला जातो. मालकीची मालमत्ता नाही किंवा पुरेशी मालमत्ता नाही म्हणून परवाना नाकारला जात नाही.
अबब...! जिल्ह्यात ४८१९ शस्त्र परवाने!
By admin | Updated: June 17, 2014 00:36 IST