अहमदनगर : संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे थकीत पैसे परत करण्यासाठी ४४६ कर्जदारांकडून वसुली करण्याची परवानगी सहकार खात्याने दिली आहे. यामुळे या कर्जदारांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्याचा निर्णय अवसायक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी संपदा पतसंस्थेच्या अवसायक मंडळाच्या सदस्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी काका कोयटे होते. यावेळी संस्थेच्या हिशोबाचे सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कर्जदार आणि ठेवीचे गुणोत्तर प्रमाण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेकडे असणार्या ठेवी आणि वाटप करण्यात आलेले कर्ज. यातून वसूल होणारे कर्ज आणि त्यातून ठेवीदारांना किती टक्के ठेवी परत देता येतील याची माहिती घेण्यात येणार आहे. संस्थेचे दोन ठेवीदार शाहपुरे आणि पारगावकर ग्राहक मंचात गेले होते. ग्राहक मंचाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून त्यांचे ठेवीची पूर्ण रक्कम देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र, सर्व ठेवीदारांना ठेवीची पूर्ण रक्कम देता येणे शक्य नसल्याने, याबाबत अवसायक मंडळाने ग्राहक मंचाला विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जदारांकडून शंभर टक्के वसुली होणार नसल्याने शंभर टक्के ठेवी परत करणे अशक्य होणार आहे. सहकार विभागाने ४४६ कर्जदारांकडून वसुली करण्यासाठी १०१ चे दाखले दिले असून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच कर्जदारांकडून वसुली करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला अवसायक मंडळाचे सदस्य सुरेश वाबळे, ठेवीदार संघटनेचे प्रतिनिधी सुरेश म्हस्के, वसुली अधिकारी अॅड. सुरेश वाबळे, सहकार खात्याचे प्रतिनिधी घोडके, पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी) पाच बड्या कर्जदारांच्या फाईल पोलिसांकडे जमा आहेत. या कर्जदारांकडे दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे. या फाईल परत मिळाव्यात अथवा त्यांच्या झेरॉक्स प्रती मिळाव्यात, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याचे काका कोयटे यांनी सांगितले.
४४६ कर्जदारांच्या मालमत्तेवर येणार टाच
By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST