राजूर/अकोले : भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यानंतर भंडारदरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १४९ दलघफू इतका राहिला आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, नेवासा आणि राहुरी या सहा तालुक्यांना वरदान ठरलेले भंडारदरा धरण यावर्षीही तुडुंब भरले होते. सिंचनाबरोबरच पिण्यासाठी वेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस या धरणातील एकूण पाणीसाठा ४४९ दलघफूटावर स्थिरावला. यातील ३०० दलघफू पाणी हा मृतसाठा आहे. त्यामुळे या धरणात यावेळी फक्त १४९ दलघफू उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे.गतवर्षी यावेळी या धरणात १ हजार १९९ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. धरणातून ७२० क्युसेक्सने पाणीही सोडण्यात येत होते. मागील वर्षीचाच विचार करता ७ जूनपासून धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली होती. यावर्षी धरणाच्या पाणलोटात अवकाळी पाऊसही बरसला नाही.निळवंडे धरणात यावेळी एकूण ४४६ दलघफू पाणी शिल्लक आहे. यातील १३५ दलघफू मृतसाठा आहे. म्हणजेच या धरणातही केवळ ३११ दलघफू उपयुक्त पाणी शिल्लक आहे. प्रवरेवरील दोन्ही धरणे मिळून ४६० दलघफू पाणी आजमितीस शिल्लक असून, उन्हाची तीव्रताही वाढतच असल्यामुळे आवर्तन बंद झाल्यानंतर पाच सहा दिवसात प्रवराकाठ कोरडा होत असतो. पाऊस लांबल्यास शिल्लक पाणीसाठ्यातून पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागास कसरत करावी लागणार, हे निश्चित. (वार्ताहर)
भंडारदऱ्यात अवघा १४९ दलघफू साठा
By admin | Updated: May 31, 2016 23:08 IST