दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 07:12 PM2020-05-16T19:12:47+5:302020-05-16T19:13:52+5:30

दया करतांना आप पर भाव नसावा. आपला किंवा परका, मित्र किंवा शत्रू कोणीही संकटात सापडला असता, त्याच्या रक्षणासाठी धावून जाणे यालाच 'दया' म्हणतात..!

Where Mercy there is religion n where religion is happyness | दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम ॥

दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम ॥

Next

-  युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वर प्राप्तीसाठी ध्यान-धारणा, पूजा-अर्चना, जप-जाप्य करीत असतांना अंगी दया, क्षमा, शांती या दैवी गुणांची नितांत गरज आहे. ज्ञानराज माऊली वर्णन करतात -

दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम ॥
सुखी पुरुषोत्तम । वसे जैसा ॥

आता प्रश्न असा आहे की, दया म्हणजे तरी काय? दयेची व्याख्या काय? तर शास्त्रकार दयेची व्याख्या करतांना म्हणतात -

परेवा बंधुवर्गे वा मित्रे द्वेष्टारिवासदा ।
आपन्ने रक्षितवय्यंतु दर्येषा परिकीर्तिता ॥

दया करतांना आप पर भाव नसावा. आपला किंवा परका, मित्र किंवा शत्रू कोणीही संकटात सापडला असता, त्याच्या रक्षणासाठी धावून जाणे यालाच 'दया' म्हणतात. अशाच भक्तांवर भगवंत प्रसन्न होतो. आपपर भावविरहित वर्तन हेच भगवंताला आवडते.
तुकाराम महाराज दया या सर्वश्रेष्ठ मूल्याबाबत लिहितात -

दया करणे जे पुत्रासी ।
तेचि दासा आणि दासी ॥

जी दया आप्तेष्टांवर तीच दया घरातील नोकर चाकरांवर असल्यास आपले वर्तन आपपर भावविरहित समजावे. ईश्वराला आपपर भाव आवडत नाही कारण -

परमात्मा श्रीहरि ।
जो अंतर्यामि सर्व शरीरि ॥
जो परांचा द्वेष करि ।
तेणे द्वेषिला परमात्मा ॥

भगवंत सर्वांच्या ह्रदयात आहे. इतरांच्या ठिकाणी द्वेष, वैरभाव ठेवल्यास त्याच्या ह्रदयात असलेल्या श्रीहरिचाच द्वेष केल्याचे पातक लागेल. सर्वांतरयामि भगवद् भाव ठेवणारा जो भक्त आहे तोच मला आवडतो असे भगवान म्हणतात.

जो सर्व भूतांचे ठायी ।
द्वेषाते नेणेंचि कांही ॥
आपपरु नाही । चैतन्य जैसा ॥
तैसा आवघाचि भूतमात्री । एकपणे जया मैत्री ॥
कृपेशी धात्री । आपण या जी ॥

जो कोणाचाही द्वेष करत नाही. सर्वांशी मित्रत्वाने वागतो. प्रत्येक प्राणीमात्रांच्या बद्दल ज्याच्या अंतःकरणांत करुणा आहे, अशाच भक्तांवर मी कृपा करतो असा वरील ओव्यांचा आशय. या सर्व संत वचनांवरुन आपल्या सहज लक्षात येईल की, दया हा गुण जीवनात निर्माण झाल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होणे शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दयेची अत्यंत सुंदर व्याख्या केली आहे. माऊली म्हणतात -

आता दया ते ऐसी ।
पूर्ण चंद्रिका जैसी ॥
निवविता न कडसी । साने थोर ॥
तैसे दुःखिताचे शिणणे ।
हिरता सकणवपणे ॥
उत्तम अधम नेणे । विचंगू गा ॥

अनाथांचे नाथ शांतीसागर श्री एकनाथ महाराजांच्या जीवन चरित्रातील प्रसंग..
नाथबाबा काशीतीर्थ यात्रा आटोपून पैठणक्षेत्री येत होते. सोबत बरीच भक्तमंडळी होती. दुपारची वेळ, ऊन कडक पडलेलं. सर्वांगाची लाही लाही होत होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. नाथबाबा शिष्याच्या समवेत एका झाडाच्या सावलीत थांबले. इतक्यात एका गाढवाचे ओरडणे नाथांच्या कानी आले. दर्याद्रनाथ तो आवाज ऐकून अशांत झाले. गाढवाचा शोध घेण्यासाठी ते इतस्ततः फिरु लागले. एका वाळूच्या ढिगाऱ्यावर एक गाढव तृषार्त होऊन लोळत होते. ते करुणदृष्य पाहून नाथांना गहिवरुन आले. धावत धावत जाऊन त्यांनी काशीवरुन आणलेली गंगामाता गाढवाच्या मुखात ओतली व ते ताडकन उठून परत चालू लागले. सोबतची भक्तमंडळी आश्चर्यचकित झाली. त्यातील एका सद्गृहस्थाने नाथांना विचारले.. आता रामेश्वर भगवंताला कोणत्या गंगेने अभिषेक करणार.? नाथ म्हणाले, बाबांनो.! हाच माझा रामेश्वर आहे. अरे.! गाढव म्हणून जर आपण त्याला मरु दिलं तर, याला निर्माण करणारा परमेश्वर प्रसन्न होईल का..? शिवाय त्याचा आत्मा आणि माझा आत्मा यात फरक कोणता.? देहांचा पडदा दूर केला तर या जगांत हरिवाचून दुसरं आहे कोण?
सज्जनहो! केवढी ही समत्व बुद्धी..! अशी समत्व बुद्धी निर्माण झाली तर भगवद् दर्शन दूर नाही. अशा दर्याद्र भक्तावरच भगवंत प्रेमाचा वर्षाव करतात.
श्रीमद् भागवतात नाथ महाराज म्हणतात -
बालक देखूनि संकटी ।
जेवी न सावरता माय उठी ॥
तेवी दिन देखोनि दृष्टी ।
ज्याचे पोटी दया द्रवे ॥
दीनाचिये दये लागी ।
जो रिघे जळत्या आगी ॥
त्याचे चरण मी वंदीवेगी ।
धन्य जगी दयाळू ॥

हरिजनाचे मूल तापलेल्या वाळूत रडत असतांना नाथांनी त्याला आपल्या घरी आणले. बिना तूप लावलेली पोळी खाल्ली तर पोट दुखेल म्हणून तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे धावणारे नामदेव महाराज आपणास माहिती आहेत, अशा अनेक संतांची भूतदया बघितली म्हणजे वाटते खरा समाजवाद या देशांत फक्त संत जगले. आज प्रगतीच्या वैज्ञानिक युगात माणूस अंतराळात गेला पण शेजारच्या माणसाच्या अंतःकरणात करुणेची गंगा त्याला निर्माण करता आली नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा या गर्वात तो आपलं माणूसपण हरवून बसला. संत बहिणाबाई म्हणतात -

अरे माणसा माणसा ।
कधी होशील माणूस ॥

आज आपल्या देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोना सारख्या वैश्विक महामारीचं भीषण संकट आलं आहे. अशावेळी आपल्या या देशात असंख्य दीन, दुबळे, आंधळे, पांगळे, मुके, बहिरे, गरजू जीव दरिद्री जीवन जगत आहेत आणि हीच खरी वेळ आणि आताच खरी गरज आहे त्यांच्यावर दया दाखविण्याची आणि त्यांच्यावर ममतेची छाया धरण्याची..! परमेश्वर हा फक्त देवळातच नाही तो तर या संपूर्ण विश्वात नटलेला आहे पण विकारविवशतेने भरलेल्या या बाजारात आज फक्त स्वार्थ, हिंसा, खून, दरोडे, बलात्कार या पाशवी अत्याचारांनीच थयथयाट मांडला आहे. या काळोख्या अंधारात संतसंगाची ही दीपकलिका प्रज्वलित ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्नवाद..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

Web Title: Where Mercy there is religion n where religion is happyness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.