नवी दिल्ली - 16 जुलैला या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येते. मात्र ते तिन्ही एका सरळ रेषेत येत नाहीत. अशा स्थितीत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येत नाही आणि अंधार पडतो याच स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात.
16 आणि 17 जुलैच्या दरम्यान रात्री 12 वाजून 13 मिनिटांनी चंद्र सूर्याच्या सावलीमुळे झाकला जाण्याची सुरुवात होईल. 1 वाजून 31 मिनिट 43 सेकंदांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि दिल्लीतील नागरिकांना पहाटे 3 वाजेपर्यंत दिसणार आहे. हे वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल.
खंडग्रास चंद्रग्रहण हे डोळ्यांनी पाहता येणार आहे. टेलिस्कॉपच्या मदतीने हे दृष्य अत्यंत सुंदर दिसणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण पाहायचं असल्यास अंधार असलेल्या मोकळ्या जागेत जा. चंद्रग्रहण हे शरिराला हानीकारक नाही. तसेच ते पाहण्यासाठी कोणत्याही खास चष्म्याची गरज नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण जवळपास तीन तास सुरू असेल. चंद्रग्रहण खगोलीय घटना असल्याने त्याचा आहाराशी कोणताही संबंध नाही.
खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी ग्रहणाचे वेध लागण्यास सुरुवात होते. मंगळवारी (16 जुलै) 4.30 वाजता ग्रहणाचे वेध लागणार आहेत. चंद्रग्रहण हे संपूर्ण भारतात दिसणार आहे. मात्र बिहार, आसाम, बंगाल आणि ओडिशा या राज्यात ग्रहणाच्या कालावधीत चंद्राचा अस्त होणार आहे. चंद्रग्रहण भारतासोबतच अफगाणिस्तान, यूक्रेन, तुर्की, ईराण, इराक, सौदी अरब, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे.
चंद्रग्रहणात कुठले ही नवीन कार्य करू नये, मल-मूत्र आणि शौच करू नये, देवी देवतांची मूर्ती आणि तुळशीच्या रोपांना स्पर्श करू नये, दातांची स्वच्छता, केसांमध्ये कंगवा फिरवू नये अशा अनेक मान्यता वर्षानुवर्षे आहेत. पण खगोलशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी या मान्यतांबाबत वेगळंच मत व्यक्त केलं.
दा. कृ. सोमण म्हणाले की, 'प्राचीन ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की, ग्रहणकाळात जेवण करू नये, मलमूत्र विसर्जित करू नये, झोपू नये. पण हे जेव्हा लिहिलं गेलंय तेव्हा ग्रहण नेमकं काय आहे हे माहीत नव्हतं. ग्रहणामुळे वातावरण प्रदूषित होतं असं त्यांना त्यावेळी वाटत असावं. पण ग्रहणाने वातावरण प्रदूषित होत नाही. या गैरसमजुती होत्या. त्यामुळे लोक ग्रहण पाळत होते.
तसेच त्यांनी सांगितले की, 'आता एकीकडे चंद्रावर यान पाठवलं जातं आणि दुसरीकडे लोक या गोष्टी पाळतात हा मोठा विरोधाभास आहे, असं वैज्ञानिकांचं मत आहे. ग्रहणकाळात या गैरसमजुती पाळण्याची अजिबात गरज नाही, असंही वैज्ञानिक सांगतात. या गोष्टी त्यावेळी जरी ग्रंथात लिहिल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या पाळणं आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरतील. त्यामुळे आधुनिक काळात आपण बदललं पाहिजे. या गैरसमजुती पाळणं योग्य नाही, असं मला वाटतं'.