शिक्षण मंडळाच्या १०, १२ वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत होणार बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:27 IST2018-09-06T14:22:01+5:302018-09-06T14:27:07+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याचा एक भाग म्हणून १० वी व १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण मंडळाच्या १०, १२ वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत होणार बदल
सुधीर खडसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याचा एक भाग म्हणून १० वी व १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावीचा बदललेला अभ्यासक्रम व १२ वीच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत बालभारतीच्या विविध विषयाच्या अभ्यासमंडळाद्वारे यंदा १० वीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. तसेच विषयतज्ज्ञ मार्गदर्शकांनी कृतीपर मुल्यमापन पद्धतीचा आराखडा तयार केला असून प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्यात आलेले आहे. याच महिन्यात पुणे येथे राज्यभरातील ठराविक शिक्षकांची विविध विषयाची कार्यशाळा राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.
बदल झालेल्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची नवीन पद्धत वर्तमान, प्रश्नपत्रिकेपेक्षा पूर्णपणे भिन्न राहणार असून यात कृतीवर मुल्यमापनला विशेष महत्व दिल्या जाणार आहे. तसेच उपाययोजनात्मक प्रश्नांवर भर दिल्या जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांमधील अभ्यासक कृतीवर लेखन कौशल्याचे आकलन केले जाणार आहे.
सीबीएसइ अभ्यासक्रमाचास्तर गाठण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने हे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या स्तरावर राज्यशिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना नेण्याचा प्रयत्न करणार आहे. परिणामत: विद्यार्थ्यांना जेईई व नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची वेगळी तयारी करण्याची गरज भासणार आहे.
सदर बदलेला अभ्यासक्रमांच्या प्रारूपानुसार कृतीपत्रिकांवर आधारीत प्रश्नपत्रिका राहणार आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना विद्या प्राधीकरणकडून देण्यात आलेले आहे. तसेच वर्ग १२ वी च्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा कृतीपत्रिका लागू करण्यात आलेली आहे.