जिल्ह्यातील वाढीव पाणीकपातीचे संकट टळले; कपातही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:25 AM2019-03-04T00:25:27+5:302019-03-04T00:25:40+5:30

धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे.

The water crisis in the district is inadequate; The reduction will also be reduced | जिल्ह्यातील वाढीव पाणीकपातीचे संकट टळले; कपातही कमी होणार

जिल्ह्यातील वाढीव पाणीकपातीचे संकट टळले; कपातही कमी होणार

Next

- सुरेश लोखंडे 
ठाणे : धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे. यासाठी ३० तास पाणीपुरवठा सक्तीने बंद ठेवला जातो. २२ ऑक्टोबरपासून या सक्तीच्या कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या पाणीकपातीत उन्हाळ्यात वाढ होण्याऐवजी ती कमी करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.
उन्हाळ्यात नागरिकांना वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याची जिल्ह्यात चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात या वाढीव कपातीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली दीड दिवसाची २२ टक्के पाणीकपात या महिनाअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र २० मार्च रोजी असलेल्या होळीला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानंतर, पाणीसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका, नगरपालिकांमधील जीवघेणी पाणीकपात कमी किंवा रद्द होण्याचे संकेत आहेत.
महापालिका, नगरपालिकांना नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; मात्र या मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज सुमारे एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलले जात आहे. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. यामुळे आॅक्टोबरपासून नागरिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. सक्तीची पाणीकपात व पाणीचोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. त्यामुळे मंजूर पाणीकोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत झाली. याशिवाय, रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरी थांबली. त्यामुळे सद्य:स्थितीला बारवीसह आंध्रा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याची नोंद लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.
मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज मनमानी पाणी उचलल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना आधीच जादा पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मंजूर पाणीकोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास आळा घालण्यात आला आहे.
>जादा पाणी उचलण्यास आळा
एमआयडीसी ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसी त्यांच्या २३४ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची नोंद करण्यात आली होती. या खालोखाल एमजेपी त्यांच्या ९० एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलले होते.
>मुबलक पाणीपुरवठा
यंदा २२ टक्के पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. ती आता लवकरच कमी होणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भार्इंदर, भिवंडी महापालिका आदी ठिकाणी उन्हाळ्यात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

Web Title: The water crisis in the district is inadequate; The reduction will also be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी