काँग्रेसचा ठाण्यातील बुलंद आवाज निमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:10 AM2017-08-16T05:10:13+5:302017-08-16T05:10:16+5:30

बाळकृष्ण पूर्णेकर यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून समाजकारणाचा ध्यास घेतला व त्याचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले.

The strong voice of the Thane Thane Congress | काँग्रेसचा ठाण्यातील बुलंद आवाज निमाला

काँग्रेसचा ठाण्यातील बुलंद आवाज निमाला

Next

ठाणे : बाळकृष्ण पूर्णेकर यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून समाजकारणाचा ध्यास घेतला व त्याचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. वडिलांनी त्यांना आनंद दिघे यांच्याकडे नेले व याचा सांभाळ करा, अशी विनंती केली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी प्रारंभी कार्य केले. सेनेचे विभाग अध्यक्षपद, कॉलेजप्रमुख, उपशहरप्रमुख, जिल्हा उपप्रमुख, त्यानंतर प्रमुखपदही पूर्णेकरांनी सांभाळले. १९९२ च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापले आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर, त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत बंड करून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या छगन भुजबळ यांच्या महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर, १९९७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर ते नगरसेवक झाले.
त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे काँग्रेसला शहरपातळीवर बळकटी मिळाली. म्हणूनच, २००५ मध्ये त्यांच्यावर सोनिया गांधी यांनी शहर जिल्हा काँग्रेसची जबाबदारी टाकली. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरून पक्षात वादळ उठले आणि त्यांना शहर जिल्हा अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. परंतु, पक्षाने त्यांच्यावर प्रदेश सचिवपदाची जबाबदारी टाकली. त्यांना प्रदेश सचिव करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. ‘आपण सारे’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्र्य केले.
पूर्णेकर रक्तदान चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांनी स्वत: ५२ वेळा रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवले होते. ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेची पकड असल्याने व त्या पक्षाची सत्ता कायम राहिल्याने विरोधी पक्ष या नात्याने आंदोलन कसे करायचे, हे शिकायचे असेल तर ते पूर्णेकर यांंच्याकडून, असे बोलले जायचे. कार्यकर्ता जपणे आणि पक्ष मजबूत करण्यावर त्यांचा भर असायचा.
>जीवनचरित्राचा आढावा
बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यापासून ठाण्यातील काँग्रेसची सुरुवात व्हायची आणि शेवटही. शिवसेनेचा वर्षानुवर्षे गड राहिलेल्या ठाण्यात पूर्णेकर यांनी चिकाटीने काँग्रेसचा ध्वज फडकवत ठेवला. पूर्णेकर यांच्यासारखा तरुण, उमदा नेता अकाली हरपल्याने ठाण्यातील काँग्रेस अक्षरश: पोरकी झाली आहे.
ठाण्यातील कोलशेत भागात राहणारे पूर्णेकर यांचा जन्म कोलशेत गावात झाला. एकत्र कुटुंबात ते वाढले. आईला घरातील प्रत्येक कामात ते मदत करत असत. शिक्षणाबरोबर क्रिकेट, खोखो, व्हॉलिबॉल, कबड्डी आणि धावणे हे त्यांचे आवडते खेळ होते. वडील फार्मास्युटिकल कंपनीत कामाला होते. त्यांना समाजकार्याची आवड होती. नोकरी, समाजकार्य करताना ते आपला पारंपरिक रेतीचा व्यवसाय करत होते. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य करण्याची इच्छा पूर्णेकर यांच्या मनात होती. १९८६ च्या निवडणुकीत वडील उभे राहिले. परंतु, त्यांचा पराभव झाला. त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे, असा निश्चय मनाशी केला होता. दहावीत असताना पूर्णेकरांच्या जीवनाला खºया अर्थाने कलाटणी मिळाली. वडिलांच्या आशीर्वादाने त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. सुरुवातीला विद्यार्थी सेनेतून ते कार्य करत होते. १९९२ च्या निवडणुकीत पूर्णेकरांनी प्रभागातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले. कोलशेत प्रवासी संघटनेची स्थापना करून प्रवासी आणि एसटीला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. प्रभागात चांगला दबदबा निर्माण झाला असताना ऐनवेळी पूर्णेकरांचे तिकीट कापून तो भाजपाला दिला गेला. त्यामुळे ते नाराज झाले व त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि दुसºया क्रमांकाची मते मिळवली. परंतु, हार मारली नाही. शिवसेनेला रामराम ठोकत समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य अव्याहत सुरू ठेवले. राज्य शासनाने १९९२ च्या सुमारास एक शासन निर्णय काढला. यापुढे ज्यांना रक्त घ्यायचे असेल, त्यांना पैसे मोजावे लागतील. शासनाच्या या निर्णयाविरोधात पूर्णेकर यांनी लढा दिला. कोणताही राजकीय पाठिंबा नसताना त्यांनी थेट मंत्रालयावर धडक दिली. सलग ११ दिवस उपोषण करून त्यांनी राज्य शासनाला निर्णयात बदल करण्यास भाग पाडले. पूर्णेकर काँग्रेसच्या संपर्कात आले. छगन भुजबळ यांच्या महात्मा फुले समता परिषदेचे कार्य त्यांनी सुरू केले. या परिषदेच्या माध्यमातून पूर्णेकर यांनी महाराष्टÑभर दौरे केला. पुढे ठाणे शहर युवक काँग्रेसची जबाबदारी पूर्णेकरांकडे सोपवली गेली.
१९९७ च्या निवडणुकीत पूर्णेकर रिंगणात उतरले आणि विजयी झाले. २००३ मध्ये राज्य शासनाने रेतीची विक्री लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित केले. यामुळे आगरीबांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. पूर्णेकरांनी या निर्णयाविरोधात लढा सुरू करून लिलाव पद्धत बंद केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००५ मध्ये पूर्णेकरांवर विश्वास टाकून जिल्हा काँग्रेसची जबाबदारी टाकली. राजकारणाच्या धकाधकीत घरच्यांसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची खंत पूर्णेकर नेहमी बोलून दाखवायचे. दररोज रात्री एक ते दीड वाजता घरी जाणे आणि सकाळी पुन्हा ९ वाजल्यापासून लोकांकरिता सक्रिय राहणे, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. राजकारणाच्या धबडग्यातून पूर्णेकर यांनी समाजकार्य सुरू ठेवले. ‘आपण सारे’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले. या संस्थेच्या माध्यमातून आरती गायन स्पर्धा, महानगरपालिका अर्थसंकल्पावर महाचर्चा, उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार सोहळा आदी उपक्रम राबवले.
मागील चार वर्षे ‘क्रांती दौड’ आयोजित करून स्थानिक खेळाडूंना त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आरोग्य शिबिर, तरुणांना नोकºया उपलब्ध करून देणे आदी कामे त्यांनी केली. त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती
त्यांना विविध पुरस्कारांच्या माध्यमातून मिळली. पूर्णेकर यांना समाजरत्न, कार्यसम्राट, समाजभूषण आदींसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. राजकारणातील नेते सत्ता व पैशांबाबत समाधानी नसतात. मात्र, देवाने जे काही दिले आहे, त्यात आपण समाधानी असल्याचे ते आवर्जून सांगायचे.
>डीअर, राजा शब्दांपासून कार्यकर्ते झाले
पूर्णेकर यांना दिवसा अथवा रात्री केव्हाही फोन केला, तरी त्यांच्या तोंडून ‘हा बोल डीअर’, ‘राजा बोल’ किंवा ‘बेटा बोल, कसा आहेस’ असेच शब्द असायचे. पूर्णेकर हयात नसल्याने यापुढे हे शब्द कानांवर पडणार नाहीत, अशी खंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
>मृत्यूची जणू लागली होती चाहूल : दि. १५ आॅगस्ट हा पूर्णेकर यांचा वाढदिवस. दरवर्षी ते रात्री १२ वाजून १ मिनीटांनी आपला वाढदिवस तिरंगा फडकावून साजरा करीत असत. एका कार्यकर्त्याने त्यांना रविवारी सकाळी १० च्या सुमारास फोन करून वाढदिवस साजरा करण्याबाबत विचारले होते. त्यावर पूर्णेकर यांनी या वाढदिवसाला कदाचित मी नसेन, असे उत्तर दिले होते. त्यांना त्यांचा मृत्यू नजरेसमोर दिसला होता की काय, अशी भावना आता शोकाकुल कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
>तडफदार नेतृत्व हरपले! - विखे-पाटील
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या निधनामुळे पक्षाचे एक उमदे व तडफदार नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. पुर्णेकरांसारखा लढवय्या कार्यकर्ता काळावर मात करून ही लढाई जिंकेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र पुर्णेकर यांच्या निधनामुळे पक्षाची मोठी हानी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The strong voice of the Thane Thane Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.