कंत्राटी सफाई कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात; प्रभाग २३ मधील भाजपा नगरसेविकेच्या त्रासाचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 05:57 PM2017-11-07T17:57:29+5:302017-11-07T17:57:45+5:30
बदनामीची धमकी देणाऱ्या भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांच्या त्रासाला कंटाळून कामगार कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग २३ मध्ये सफाई काम करणा-या कंत्राटी कामगारांना सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देणाऱ्या भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांच्या त्रासाला कंटाळून कामगार कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
म्हात्रे या प्रभागातील कंत्राटी सफाई कामगारांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करतात. त्यांना मारहाणीची धमकी देत विश्रांतीच्या वेळेतही जबरदस्ती काम करण्यास सांगतात. त्याचा कहर म्हणजे एका स्थानिक मुकादमला व कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला चारित्र्यहननची बदनामीकारक धमकी देतात. कामाला नकार देणाऱ्या कामगारांची खोटी तक्रार प्रशासनाकडे करून कामगारांची बदली करणे वा त्यांना कामावरुन कमी करण्याचा प्रकार करीत असल्याने म्हात्रे यांच्याविरोधात भार्इंदर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले.
पालिकेतील कंत्राटी सफाई कामगार संघटनेचे सदस्य असल्याने संघटनेने आ. नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता व आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे देखील म्हात्रे यांच्याविरोधात लेखी तक्रार करुन दाद मागितली. यानंतरही म्हात्रे यांचा उपद्रव वाढला असून, तक्रारीचा राग मनात ठेवून त्यांनी कामगारांना आणखी त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप संघटनेचे पदाधिकारी मंगेश पाटील यांनी केला आहे.
म्हात्रे यांचा वाढत्या त्रासाला तसेच बदनामी करण्याच्या धमकीची दखल कोणीही न घेतल्यानेच कामगारांनी अखेर संघटनेच्या माध्यमातून कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले कि, स्थानिक नगरसेविका नयना म्हात्रे यांनी कामगारांना नाहक त्रास देणे योग्य नाही. कामगारांच्या कामाच्या बाबतीत तक्रारी असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्याऐवजी कामगारांना स्वत:च शिवीगाळ करून धमकी देणे कोणत्याही लोकप्रतिनिधींना अशोभनीय आहे. याप्रकरणी कामगारांनी वरीष्ठ लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे दाद मागितली आहे. त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच कामबंद आंदोलन छेडण्यात येईल. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या त्रासामुळे कामगारांवर आंदोलन छेडण्याची ही पहिलीच वेळ ठरणार असली तरी भाजपच्या अच्छे दिनात कामगारांना भाजपचेच लोकप्रतिनिधी बुरे दिन दाखवित असल्याचे खेदाने म्हणावेसे वाटत आहे.