Maharashtra Bandh : साताऱ्यात कडकडीत बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:01 IST2018-08-09T13:58:31+5:302018-08-09T14:01:50+5:30
मराठा समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनी राज्यव्यापी बंद पुकारल्याने गुरुवारी सकाळपासून साताऱ्यांत सर्वत्र कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Maharashtra Bandh : साताऱ्यात कडकडीत बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात
सातारा : मराठा समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनी राज्यव्यापी बंद पुकारल्याने गुरुवारी सकाळपासून साताऱ्यांत सर्वत्र कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २५ जुलै रोजी झालेल्या मोर्चानंतर महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली होती. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवला होता. गुरुवारी सकाळपासून एकही दुकान न उघडल्याने सर्व बाजारपेठ बंद होती.
बाजार समितीच्या आवारात भाजी मंडईमध्ये सकाळी काही शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. मात्र, ग्राहक नसल्याने अनेकांना आपला शेतमाल फेकून द्यावा लागला. एसटी प्रशासनाच्या वतीने सर्व बसच्या फेऱ्या रद्द केल्याने बसस्थानकाच्या परिसरात शांतता पसरली होती. तसेच सर्व शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थीही फिरकले नाहीत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. शहर तसेच ग्रामीण भागातून अनेकजण या आंदोलनात सहभागी होत आहेत.