खरंतर, मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली! अजित पवारांचा राजकीय भूमिकेबाबत ‘पत्रप्रपंच’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:10 AM2024-02-29T11:10:09+5:302024-02-29T11:10:35+5:30

संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास मांडला आहे...

In fact, I got my chance in politics by accident! Ajit Pawar's 'Letter Prapanch' Regarding Political Role | खरंतर, मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली! अजित पवारांचा राजकीय भूमिकेबाबत ‘पत्रप्रपंच’

खरंतर, मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली! अजित पवारांचा राजकीय भूमिकेबाबत ‘पत्रप्रपंच’

बारामती : सन १९९१पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रिपद दिले, कोणी संधी दिली, याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरेतर, मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली! त्याकाळी राज्यस्तरावर नेतृत्त्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास मांडला आहे.

राज्यातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या या पत्रप्रपंचात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत जात वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हे पत्र लिहीत असल्याची सुरुवात पवार यांनी पत्रात केली आहे.

पवार पुढे म्हणतात, संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले. इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वत:ला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते, तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल, यावरच कायम माझा भर राहिला. पहाटे पाचपासून काम सुरू करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली. कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केले, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल, यासाठी मी कायमच प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून राजकारण, समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आज आणि भविष्यातही विकास हाच माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम कायम असेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले आहे.

आजही मी फक्त भूमिका बदलली

काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावीत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल. वडीलधाऱ्यांविषयी कायमच आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका बदलली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील, ही स्वच्छ भूमिका आहे. यात कोणाचा कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल, अशी भावना उपमुख्यमंत्री पवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

Web Title: In fact, I got my chance in politics by accident! Ajit Pawar's 'Letter Prapanch' Regarding Political Role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.