फडणवीसांची जात मी पाच वर्षांत कधी काढली?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:59 AM2019-04-18T06:59:54+5:302019-04-18T07:12:44+5:30

अपराधभावाने पछाडलेली (गिल्टी कॉन्शस) व्यक्ती कशी बोलते, याचे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मला ‘जातीयवादी’ म्हणणे होय.

When did I get the freedom of Fadnavis in five years? | फडणवीसांची जात मी पाच वर्षांत कधी काढली?

फडणवीसांची जात मी पाच वर्षांत कधी काढली?

Next

- सुकृत करंदीकर 

पुणे : अपराधभावाने पछाडलेली (गिल्टी कॉन्शस) व्यक्ती कशी बोलते, याचे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मला ‘जातीयवादी’ म्हणणे होय. ते मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मी कधी, कुठे त्यांची जात काढली? ‘पेशवाई’ शब्द कधी वापरला, हे त्यांनी सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. निवडणुका आल्या की, पवार जातीयवादी होतात, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याचा प्रतिवाद पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.
कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली असता, ‘छत्रपतींची नेमणूक आता पेशवे करू लागले,’ या आशयाची टिप्पणी पवारांनी केली होती. त्यावर पवारांनी खुलासा केला की, पद मागण्यासाठी संभाजीराजे भाजपाकडे गेले, या अर्थाने ती टीका होती. आमच्या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. काय गरज होती, त्यांना पद मागण्याची? पक्षातला माणूस पदासाठी जातो, म्हणून ती टीका मुख्यमंत्र्यांवर नव्हे, तर संभाजीराजेंना उद्देशून केली होती. पवार म्हणाले की, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अप्रत्यक्ष जातीयवादी टीका आपण एकदाच केली होती, पण नंतर आम्ही थांबलो. मुलाखतीचा सारांश पुढीलप्रमाणे.
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ‘मोदी’ की ‘राहुल’ हा उभा केला जाणारा प्रश्न महत्त्वाचा आहे का?
राहुल गांधी पंतप्रधान व्हावे, म्हणून कोणीही त्यांना ‘प्रोजेक्ट’ केलेले नाही. त्यांनी स्वत:च सांगितले आहे की, मी स्पर्धेत नाही. मग राहुल यांचे नाव का घेतले जाते? ही मोदींची आणि मोदीभक्तांची रणनीती आहे. तुमच्याकडे नेतृत्व कोणाचे, असे मोदीभक्त विचारतात. त्यांनी २००४ ची निवडणूक लक्षात ठेवावी. त्यावेळी आम्ही एकत्र लढलो नव्हतो. निकालानंतर एकत्र बसलो आणि ‘यूपीए’ची स्थापना केली. त्यावेळी जे स्वत: उभे निवडणुकीला उभे नव्हते, त्या डॉ. मनमोहन सिंग यांची निवड आम्ही केली.ते सक्षम प्रधानमंत्री होऊ शकले. देशात, देशाबाहेर त्यांच्या बद्दलची आस्था निर्माण झाली. २००४ मध्ये जे घडले ते २०१९ मध्ये का घडू शकत नाही?
भाजपा सरकार गेले पाहिजे, यावर एकमत असणारे विरोधक विविध राज्यांमध्ये एकमेकांविरोधात कसे लढत आहेत?
२००४ ला हेच होते. त्यावेळी ‘अच्छे दिन’ ऐवजी ‘इंडिया शायनींग’ होते. त्यावेळी आजच्या मोदींपेक्षाही लोकप्रिय पंतप्रधान होते. माझ्या मते अटलबिहारी वाजपेयी हे अधिक स्वीकारार्ह, वादग्रस्त नसलेले आणि थोडे व्यापक विचाराचे पंतप्रधान होते. त्या कालखंडातसुद्दा शेवटी लोकांनी बदल केला. हा बदल करताना कुठल्याही पक्षाला बहुमत दिले नाही. पण सगळ््या पक्षांनी एकत्र येत स्थिर सरकार दिल्याचे लोकांनी अनुभवले आहे. २००४ चा अनुभव चांगला आल्याने २००९ मध्ये आघाडीच्या जागांमध्ये आणखी वाढ झाली.


म्हणजे कॉंग्रेस किंवा भाजपा या राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांची आघाडी सरकारे देशाला जास्त उपयुक्त ठरतात का?
ही वस्तुस्थिती कशी टाळता येईल? देशाच्या प्रगतीला त्याची अडचण होत नाही. कार्यक्रम स्वच्छ असला पाहिजे, एवढेच.
‘माढ्यातून पवारांनी पळ काढला,’ असा प्रचार विरोधकांनी चालवला आहे. राज्यातल्या प्रत्येक सभेत पंतप्रधान तुम्हालाच लक्ष्य करतात. याकडे कसे पाहता?
चौदा निवडणुका लढवल्या. सगळ््या जिंकल्या. २०१४ ची निवडणूक साडेतीन लाख मतांनी माढा जिंकणारा माणूस पळून येतो का? पंतप्रधानांनीही पोरकट विधाने करु नयेत. पदाची प्रतिष्ठा राखावी. पंतप्रधानांना माझी नोंद घ्यावी लागते, यावरुन काय ते समजा.
‘मी पण ध्यानात ठेवलंय,’ असा इशारा तुम्ही नुकताच कोल्हापुरात दिला. ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या पवारांचे असे इशारे भल्याभल्यांना गर्भगळीत करत. अलिकडे मात्र उघड बंड, नेतृत्वाला न जुमानण्याचे प्रकार घडताना दिसतात. नेतृत्वही काही बाबतीत नमते घेताना दिसते. वचक कमी झाल्याचे हे लक्षण म्हणावे का?
सत्तेचा गैरवापर करुन काही गोष्टी घडत आहेत. व्यक्तीगत हल्ले होत आहेत. राज्यातल्या काही महापालिकांमध्ये कॉंग्रेस-भाजपा, शिवसेना-कॉंग्रेस, भाजप-राष्ट्रवादी एकत्र आहेत. हे स्थानिक राजकारण असते. त्यात आम्ही पडत नाही. पण राज्याचा-देशाचा जिथे प्रश्न येतो तिथे ठाम भूमिका असते.

गुजरात मॉडेलचा फुगा
मोदी म्हणजे गुजरात मॉडेल म्हणजे विकासाचे मॉडेल असे २०१४ मध्ये लोकांना वाटले. हेच देशाच्या विकासाचे मॉडेल होईल, अशी अपेक्षा होती. त्या दृष्टीने काही झाले नाही. पंतप्रधानांनी कोणतेच ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह’ निर्णय घेतले नाहीत. आमच्या काळात असणारा कृषी विकासाचा दर पाच-साडेपाच वरून निम्म्याने खाली आला. गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
बेरोजगारांची संख्या वाढली. नवी रोजगारनिर्मिती ठप्प झाली. गेल्या पाच वर्षात नवी गुंतवणूक आली नाही. म्हणून लोकांची
नाराजी आहे. फसगत
झाल्याची भावना आहे, असे पवार म्हणाले.
>नरेंद्र मोदींसोबत कदापि जाणार नाही
२०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपने न मागताच तुम्ही पाठिंबा देऊ केला होतात. लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदींना गरज पडल्यास याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता किती?
२०१४च्या विधानसभेला भाजप व शिवसेना वेगवेगळे लढले. ते दोघे एकत्र येऊ नयेत, हा आमचा हेतू होता. त्यासाठी आम्हाला कुठेतरी मधाचे बोट त्यांना लावायची गरज होती. मुख्यमंत्र्यांना शिवसेना हवी होती, हे मला माहिती होते, पण राष्ट्रीय नेतृत्वातील काहींना मान्य नव्हते, हेही मला माहिती होते. त्यांनी एकत्र येऊ नये, म्हणून आम्ही पाठिंब्याचे वाक्य टाकले. सरकार बनले, तेव्हा सहा महिने शिवसेना सरकारमध्ये नव्हती. त्याचे कारण आम्ही केलेला हा उद्योग होता. आम्ही देऊ केलेला पाठिंबा ही ‘राजकीय गुगली’ होती, पण २०१९मध्ये भाजपसोबत जाणे ‘आउट आॅफ क्वेश्चन’ आहे.
>मोदींचा टीमवर्कवर विश्वासच नाही
देशाचा कारभार चालवताना प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे असतात. सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकटा माणूस पुरेसाही पडत नाही. त्यासाठी टीम लागते आणि या टीमला अधिकार लागतात. मोदींचा टीमवर्कवर विश्वासच नाही. गेल्या पाच वर्षांत मंत्र्यांकडे अंतिम अधिकार असल्याचे कधीच दिसले नाही. जेव्हा मंत्रिमंडळातले मंत्रीच दबक्या आवाजात सांगतात, ‘आम्ही बोललो, तुम्हीही जरा बोला!’
>पवार म्हणतात...
राज ठाकरे यांना मोदी-शहा या घातक जोडीविषयी जागृतीची गरज वाटते. मी त्यांची भाषणे वाचली. ते जे प्रश्न विचारतात, त्यातून भाजप-सेनेचे वास्तव रूप लोकांपुढे येईल. त्याचा काहीसा फायदा आम्हाला होईल.
‘मोदी सरकार निवडून आले, तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत,’ अशी भीती अनेकांना वाटते. मला वाटत नाही. घटनेची पायमल्ली लोक कधीही सहन करणार नाहीत, पण मोदींच्या स्टाईलमुळे लोकांना तसे वाटते.
भाजप मोठा पक्ष ठरला, तर सत्तास्थापनेचे प्रयत्न ते करेल, पण दोनशेपेक्षा कमी जागा आल्यास मोदी नेता असणार नाहीत. ‘मोदी नसल्यास सहकार्य करू,’ अशी भूमिका अनेक पक्ष घेऊ शकतात.
‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने गेल्या वेळी सहा जागा जिंकल्या. यावेळी त्यात तिपटीने किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होईल.

Web Title: When did I get the freedom of Fadnavis in five years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.