Lok Sabha Election 2019: राष्ट्रवादीत ठाणे लोकसभा उमेदवाराबाबत संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:13 AM2019-03-11T01:13:19+5:302019-03-11T01:14:01+5:30

नाईक पिता-पुत्रांचा नकार कायम : महापौर जयवंत सुतार यांच्या नावाची चाचपणी

Lok Sabha Election 2019: Constituency in Thane Lok Sabha candidate in NCP remains confused | Lok Sabha Election 2019: राष्ट्रवादीत ठाणे लोकसभा उमेदवाराबाबत संभ्रम कायम

Lok Sabha Election 2019: राष्ट्रवादीत ठाणे लोकसभा उमेदवाराबाबत संभ्रम कायम

googlenewsNext

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे; परंतु ठाणे लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत संभ्रम कायम आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास असहमती दर्शविली आहे. तर बदलेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा नाईक यांचे पुत्र संजीव नाईक हेसुद्धा या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास फारसे इच्छुक नसल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोठात नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समजते.

ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो. २0१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेचा फटका नाईक कुटुंबीयांना बसला. शिवसेनेचे राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला, तर त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा क्षेत्रातून पराभव पत्करावा लागला.

निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे यांनी नाईकांचा या निवडणुकीत पराभव केला; परंतु ऐरोली विधानसभा क्षेत्रातून नाईकांचे दुसरे पुत्र संदीप नाईक यांनी अवघ्या साडेआठ हजार मतांची आघाडी घेत आपली जागा राखली. एकूणच २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या तडाख्यात नाईकांच्या घराणेशाहीला जबरदस्त हादरा बसला; परंतु त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत महापालिकेतील आपली सत्ता अबाधित ठेवली.

नवी मुंबई महापालिका आणि या महापालिका क्षेत्रातील ऐरोली विधानसभा क्षेत्राचा अपवाद सोडता ठाणे लोकसभा क्षेत्रातील पाच विधानसभा आणि महापालिका शिवसेना आणि भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक तितकीच जोखमीची ठरणार आहे.

लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक यांना तीन लाख १०० मते मिळाली होती. यात ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून मताची आघाडी अधिक होती. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे विजय चौगुले यांचा जवळपास ५० हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाईक यांना जवळपास तितकीच म्हणजेच तीन लाख १४ हजार मतांवर समाधान मानावे लागले. ऐरोली आणि बेलापूर क्षेत्रातून त्यांचे मताधिक्य गतनिवडणुकीच्या तुलनेत घटल्याचे दिसून आले.

पनवेल-उरणमध्ये आघाडीचे नवीन समीकरण
मावळमध्ये कर्जत, उरण आणि पनवेलमधील तीन विधानसभा मतदारसंघ तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. मावळ मतदारसंघाची पहिली निवडणूक आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि युतीतील शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यामध्ये झाली. त्यात बाबर यांनी बाजी मारली.
यंदा मावळ मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी, असे प्रयत्न सुरू आहेत. खासदार बारणे यांनी पाचही वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, दांडगा लोकसंग्रह, निधीचे नियोजन आणि अगदी तळागाळात,
दुर्गम भागात जाऊन काम करण्याचे तंत्र यामुळे हा मतदारसंघ शिवसेना सहजासहजी सोडेल की नाही? हे सांगता येत नाही.
गेल्या वेळी शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवित लक्ष्मण जगताप यांनी सुमारे साडेतीन लाख मते मिळवून आपली चुणूक दाखविली होती. मात्र, यंदा शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा तगडा उमेदवार दिल्यास मतदारसंघाचे चित्र बदलेल, असे वाटते.
त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नावे चर्चेत आली होती. खुद्द स्मिता पाटील यांनी उमेदवारी लढणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पार्थ पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पवार आणि बारणे यांच्यामधील लढत रंगतदार होईल हे नक्की.

Web Title: Lok Sabha Election 2019: Constituency in Thane Lok Sabha candidate in NCP remains confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.