मिशन इलेक्शन... प्रियंका गांधींची 'चाय पे चर्चा'; आसाममधील मळ्यात पानं खुडली, मजुरांची केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 01:29 PM2021-03-02T13:29:58+5:302021-03-02T13:35:18+5:30

Assam Election 2021 : प्रियंका गांधींनी केला दोन दिवसीय आसामचा दौरा, २७ मार्चपासून तीन टप्प्यात होणार मतदान

महिन्याच्या अखेरिस आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या आसाममध्ये दाखल झाल्या आहेत.

त्यांनी चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसंच त्यांच्या कामाचं स्वरूपही जाणून घेतलं. त्यांच्या आसाम दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे.

काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंदर्भातील काही फोटो शेअर केले आहेत. प्रियंका गांधी यांनी आसाममधील सदरू टी एस्टेटमध्ये महिला मजुरांशी संवाद साधला.

यानंतर प्रियंका गांधी यांनी चहाच्या पानं खुडत मजुरांशी गप्पाही मारल्या आणि कामाचं स्वरूपही जाणून घेतलं.

प्रियंका गांधी या त्या ठिकाणी पारंपारिक वेशभुषेत उपस्थित होत्या. यापूर्वी राहुल गांधी यांनीदेखील आसामचा दौरा केला होता.

प्रियंका गांधी यांच्या आसाम दौऱ्याचा आज अखेरचा दिवस आहे. यापूर्वी त्यांनी कामाख्या मंदिरात पूजा करून आपल्या दौऱ्याला सुरूवात केली होती.

आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

२७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल या तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी मतदान होणार असून २ मे रोजी निकाल जाहीर केले जातील.

सध्या आसाममध्ये एनडीएचं सरकार असून सर्वानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं ८९ जागांवर निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी ६० जागांवर त्यांना विजय मिळाला होता. तर दुसरीकडे काँग्रेसनं १२२ जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना केवळ २६ जागांवर विजय मिळवता आला होता.