Corona Virus : मोठा दिलासा! उन्हाळ्यात कोरोना रुग्णांमध्ये घट होणार पण...; तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:25 PM2023-04-04T14:25:19+5:302023-04-04T14:44:24+5:30

Corona Virus : कोरोना अजूनही वृद्धांसाठी आणि आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीसह संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्गाचा दरही वाढत आहे आणि दिल्लीत तो 15 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. सध्या 99 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या वाढीमागे अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये व्हायरसचे वारंवार होणारे म्यूटेशन आणि नवा व्हेरिएंट XBB.1.16 या नवीन प्रकाराचा संसर्ग आहे. ते वेगाने पसरतात, परंतु गंभीर बनवत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोकांच्या वागण्यात बदल झाला आहे आणि हे हवामान संसर्ग पसरवण्यास मदत करते. उष्णता येताच संसर्गाचा प्रभाव कमी होईल.

मेदांता हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटर्नल मेडिसिन अँड रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, "याला 'स्मॉल वेव्ह' म्हणता येईल, पण त्यामुळे डेल्टा प्रकारासारखा गंभीर आजार होत नाही."

"संक्रमण वाढत आहे हे निश्चितच आहे. याचे एक कारण हवामान हे देखील आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे हवामान येते तेव्हा ते व्हायरस पसरण्यास मदत करते. जेव्हा जेव्हा आर्द्रता असते तेव्हा हा व्हायरस हवेत बराच काळ जिवंत राहतो आणि त्यामुळे जास्त संसर्ग होतो."

जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसतसा संसर्ग कमी होईल. तापमान 40 अंशांच्या वर गेल्यावर हा व्हायरस टिकू शकणार नाही. डॉ. गुलेरिया म्हणाले की, येत्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले की, सध्या जी तपासणी केली जात आहे ती रँडम टेस्ट नाही. ज्यांना ताप, सर्दी, खोकला आहे तेच लोक तपासणीसाठी जात आहेत, त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे.

या संदर्भात मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसिनच्या प्रोफेसर सुनिला गर्ग यांनी सांगितले की, सर्वप्रथम हे जाणून घ्या की कोरोना कुठेही गेला नाही आणि कुठेही जाणार नाही. प्रकरणे येत राहतील कारण व्हायरस म्यूटेशन होत आहे.

ते म्हणाले की हे खरे आहे की आता परिस्थिती महामारीच्या समाप्तीच्या दिशेने आहे, ती पूर्वीसारखी धोकादायक नाही. पण लोकांनी ते हलकेच घ्यायला सुरुवात केली आहे. हे योग्य नाही. लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावे, गर्दीत किंवा रुग्णालयात जाताना मास्क घालावा.

60 वर्षांवरील लोकांनी बूस्टर डोस घ्यावा. अनेक केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध नाहीत, सरकारने तेथे लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असेही ते म्हणाले. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, इन्फ्लूएंझाप्रमाणेच कोरोनाची लसही दरवर्षी बदलावी लागेल.

याचे कारण असे की, ज्या प्रकारे मूळ व्हायरस बदलत आहे, त्याचा प्रभाव येत्या काळात कमी होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला नवीन लसीची गरज भासू शकते. ज्याप्रमाणे इन्फ्लूएंझा लस दरवर्षी म्युटेशनच्या आधारे बदलून लाँच केली जाते, तशीच गरज कोरोना लसीमध्येही असू शकते.

ते म्हणाले की याची सर्व शक्यता आहे, कारण सध्याची लस चीनमधून आलेल्या व्हायरसच्या जुन्या स्ट्रेनवर बनविली गेली आहे. ते आता प्रभावी आहे, परंतु भविष्यात ते किती प्रभावी होईल हे सांगणे कठीण आहे. आम्हाला न्यू जनरेशनच्या लसीची आवश्यकता असू शकते.

कोरोना अजूनही वृद्धांसाठी आणि आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी लस आवश्यक असू शकते. दरवर्षी किंवा दोन वर्षांतून एकदा लस बदलण्याची गरज आहे का, हे पाहावे लागेल. पण परिस्थिती पाहता आगामी काळात इन्फ्लूएन्झाच्या धर्तीवर कोरोनाची लस आणण्याची गरज भासू शकते, अशी माहिती आहे.

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले की, सध्या आपल्याकडे असलेली लस कोरोनाला कव्हर करत आहे. पण गेल्या साडेतीन वर्षांत सातशेहून अधिक व्हेरिएंट आले आहेत, दर आठवड्याला सरासरी चार ते पाच म्यूटेशन येतात.

दिलासादायक बाब आहे की यापैकी फक्त 5 प्रकार चिंतेचे आहेत. परंतु, असेच बदल चालू राहिल्यास, असे होऊ शकते की सध्याची लस कमी प्रभावी आहे, अशा परिस्थितीत आम्हाला नवीन लसीची आवश्यकता असू शकते. पण ते कोणत्या प्रकारचे असेल हे सांगणे खूप घाईचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.