Worlds First E Rikshaw From Maharashtra: गर्व वाटेल...! जगातील पहिली ई-रिक्षा कोणी बनविलेली? २००० साली, महाराष्ट्राच्या फलटणमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 03:20 PM2022-02-19T15:20:23+5:302022-02-19T15:33:07+5:30

Padmashree Anil K Rajvanshi Inspirational Story: गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला शहरांमध्ये ई-रिक्षा फिरताना दिसत आहेत. आता ईस्कूटर, ई कार आदी बरेच प्रकार आलेत. परंतू जगात पहिली ईलेक्ट्रीक स्कूटर कोणी आणि कुठे बनविली हे माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्राच्या मातीत

गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला शहरांमध्ये ई-रिक्षा फिरताना दिसत आहेत. आता ईस्कूटर, ई कार आदी बरेच प्रकार आलेत. परंतू जगात पहिली ईलेक्ट्रीक स्कूटर कोणी आणि कुठे बनविली हे माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्राच्या मातीत, साताऱ्याच्या फलटण शहरामध्ये.

विश्वास बसत नाहीय ना, बसणार कसा... आपल्याला सर्व परदेशात लागणाऱ्या संशोधनातून अद्ययावत वस्तू घेण्याची सवय लागलीय ना. परंतू, या अवलियाने २७ वर्षांपूर्वी ई रिक्षा बनविण्याचा विचार केलेला. तेव्हा तर पेट्रोलची किंमतही २७ रुपयांच्या आसपास होती.

डॉ. अनिल कुमार राजवंशी यांनी ही ई रिक्षा बनविली होती. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित असल्याने १९८१ मध्ये भारतात काहीतरी करण्यासाठी ते परदेशातील मोठी संधी सोडून आले होते. तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठातून शिक्षण घेतले होते.

खरेतर डॉ. अनिल हे काही महाराष्ट्रीयन नाहीत. ते मुळचे लखनऊचे. त्यांना कानपूरच्या आयआयटीमधून बीटेक आणि एमटेक केले. त्यानंतर फ्लोरिडाला जाऊन त्यांनी पीएचडी मिळविली. तिथेच ते अडीच वर्षे राहिले. परंतू भारत बदलण्याचे स्वप्न त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हते. ते म्हणतात की, त्यांच्या मित्रांप्रमाणे ते अमेरिकेत राहू शकले असते. परंतू माझ्या वेडापाई मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

शिकत असताना त्यांना शिक्षक बनण्याची ओढ होती, तसेच वाफेच्या इंजिनांमध्ये आधीपासून रुची होती. यामुळे त्यांनी फ्लोरिडा गाठले. तिथेच त्यांना त्यांची सोलमेट मिळाली, नंदिनी. 1976 मध्ये फ्लोरिडामध्येच त्यांनी लग्न केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी जवळपास एक महिना भारत फिरले, कुठे सेटल व्हावे यासाठी त्यांनी शोध घेतला.

यावेळी त्यांना आयआयटी मुंबई, भेल आणि टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टीट्यूटकडून नोकरीची ऑफर होती. परंतू त्यांना त्यांच्या स्वप्नांना अडथळा नको होता. यामुळे डॉ. अनिल यांनी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या महाराष्ट्रातील साताऱ्याचे फलटण शहर निवडले.

फलटणची निंबाळकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टीट्यूट (NARI) या एनजीओमध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली. १९९५ मध्ये त्यांच्या डोक्यात ई रिक्षाचा विचार आला. त्यावर त्यांनी संशोधन सुरु केले. आणि अखेर २००० साली जग जेव्हा वायटुकेमध्ये अडकले होते तेव्हा त्यांनी पहिली ई रिक्षा बनविली.

ही ई रिक्षा Permanent Magnet DC motor वर चालणारी होती. आज भल्या भल्या कंपन्या रेंजसाठी झगडत असताना डॉ. अनिल यांनी तेव्हा तीन पॅसेंजर, एक ड्रायव्हर आणि रिक्षाचा भार असा घेऊन जाणारी एका चार्जमध्ये ६० ते ७० किमीची रेंज देणारी रिक्षा बनविली. या रिक्षाचा वेग ताशी ३५ ते ४० किमी होता.

तेव्हाच या एनजीओमध्ये देशविदेशातून लोक येण्यास सुरुवात झाली होती. अनेकांनी या ई रिक्षाची कॉपी त्यांच्या देशात केली, काही यशस्वी झाले, काहींनी त्यात बदल केले. लहान इन्स्टीट्यूट असल्याने ते या प्रकाराविरोधात लढू शकले नाहीत.

आज याच अनिल यांच्या नावावर अल्कोहोल स्टोव्ह, बायोमास गॅस आणि ई रिक्षाचे सात पेटंट आहेत. आज याच डॉ. अनिल राजवंशी यांना भारत सरकारने यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.