Sri Lanka Emergency News: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर आणखी एक संकट; राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केली आणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 09:09 AM2022-05-07T09:09:44+5:302022-05-07T09:20:46+5:30

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. ही आणीबाणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून असेल.

देशाची बिघडलेली परिस्थिती आणि राजकीय अस्थिरता पाहता राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या गंभीर आर्थिक संकटामुळे महिंदा राजपक्षे सरकारला लोकांच्या नाराजीचा आणि आंदोलनाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे भाऊ महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याबाबत वक्तव्य केले होते. तेव्हा श्रीलंकेत काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात येणार असून त्यात विरोधी पक्षांचे नेतेही असतील, असे सांगण्यात आले.

श्रीलंकेच्या सत्ताधारी आघाडीच्या इतर सदस्यांनीही पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जेणेकरून सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसह अंतरिम सरकार स्थापन करता येईल.

मात्र, राजपक्षे यांनी सातत्यानं सभागृहात बहुमत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, श्रीलंकेत गुरुवारी गुप्त मतदानाद्वारे झालेल्या संसदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सरकार समर्थित उमेदवार विजयी झाला. संकटात सापडलेल्या राजपक्षे कुटुंबासाठी हा महत्त्वपूर्ण विजय मानला जात आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेला श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे श्रीलंकेने विदेशी कर्जाची परतफेड पुढे ढकलली आहे.

या वर्षी ७ अब्ज डॉलर्स विदेशी कर्ज आणि २०२६ पर्यंत २५ अब्ज डॉलर्स भरावे लागणार आहेत. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा एक अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झाला आहे. अशा स्थितीत श्रीलंकेकडे या वर्षीही परदेशी कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा शिल्लक नाही.

श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि क्रीडा मंत्री एकाच कुटुंबातील होते. अशा परिस्थितीत श्रीलंकेतील सर्वसामान्य जनता राजपक्षे कुटुंबाला आर्थिक संकटासाठी जबाबदार मानत आहे.

श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि क्रीडा मंत्री एकाच कुटुंबातील होते. अशा परिस्थितीत श्रीलंकेतील सर्वसामान्य जनता राजपक्षे कुटुंबाला आर्थिक संकटासाठी जबाबदार मानत आहे.