खेडय़ापाडय़ातले आर्ची, परशा प्रेमदीवाने होतात तेव्हा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:33 PM2019-02-14T13:33:28+5:302019-02-14T13:34:32+5:30

ग्रामीण आणि शहरी लेकरं पबजी खेळतात, एमपीएस्सी करतात, शिनमा बघतात, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून दोघांची बोटं फिरत असतात. मास्तर तेच, तेच शिक्षण, तेच खायला-प्यायला. सगळं तुमचं आमचं सेम असतं. प्रेम तेवढं सेम नसतं. एखाद्यानं जर यष्टीत बसता बसता नोट्सची देवाणघेवाण जरी केली तरी पहिले दोस्तलोकच प्रकरण म्हणून बोंब ठोकतात.

love stories in rural Maharashtra & social norms | खेडय़ापाडय़ातले आर्ची, परशा प्रेमदीवाने होतात तेव्हा...?

खेडय़ापाडय़ातले आर्ची, परशा प्रेमदीवाने होतात तेव्हा...?

Next
ठळक मुद्देग्रामीण तरुण-तरुणींच्या यशस्वी प्रेमाचं प्रमाण हे 15-20 टक्के याहून जादा नाही. शंभर जोडप्यातले मधले 15-10 जणच असे यशस्वी होतात. बाकीच्यांचा पुनर्जन्मावर विश्वास असतो.

- श्रेणिक नरदे

जगातल्या प्रत्येक पोराला/पोरीला वाटतं आपल्यावर कोणतरी फिदा झालं पाहिजे. जीव ओवाळून भिरकावला पाहिजे. आपल्याला हवा तसा जोडीदार गावला पाहिजे. आपणही त्याच्यावर तेवढाच जीव लावू. फिदा होऊ. वाट्टंल ते करू! 
कॉलेजात कशाला असं एक स्वप्न साधारणतर्‍ सातवी-आठवी-नववीला असतानाच पडत असतंय. हे स्वप्न बघण्याचं वय कवळं असतंय. आत्ता जे लोक साधारण पंचवीस-तीसला आलेत अशा लोकांनी थोडं बारीक होऊन आठवीत जाऊन बघावं. आपण आपल्या स्वप्नात काय काय शहाणपणा केलता आणि वास्तवात काय भानगडी झाल्या याचा विचार केला तरी तेव्हा आपण काय आणि किती शहाणपणा केलता ही भावना आपल्या लै म्हणजे लै लाजवते.
वास्तवात आलं की, अरारा काय आपण बुद्धी लावून आभाळ रंगवायचो असं वाटतं. प्रत्यक्षात तसलं 70 ते 80 टक्केपण घडत नसतं.
हे असं सगळीकडे असतंय. आता गाव आणि शहर हे तसं कॉलेजातल्या पोरापोरींच्या बाबतीत बघायला गेलं तर काही तसं अंतर राहिलं नाही. ग्रामीण आणि शहरी लेकरं पबजी खेळतात, दोन्ही ठिकाणची पोरं एमपीएस्सी करतात, शिनमा बघतात, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळ्यावरून दोघांची बोटं फिरत असतात. मास्तर तेच, तेच शिक्षण, तेच खायला-प्यायला. सगळं तुमचं आमचं सेम असतं. 
दोघांच्यातलं प्रेम तेवढं सेम नसतं.
तर ते कसं काय? 
प्रेम हे प्रेम हाय गावातलं काय आणि शहरातलं काय? पण दोघांच्या घरातली आणि गावातली डोस्की सेम नसतात. शहरातले लोक बर्‍यापैकी म्यॅचुअर झालेले असतात. त्यामुळं पोरगा एखादी मैत्नीण घरी सहज नेऊ शकतो. हिकडं तसं नसतंय. घर तर लांबच एखाद्यानं जर नुस्ता यष्टीत बसता बसता नोट्सची देवाणघेवाण जरी केली तरी पहिले दोस्तलोकच विचारतात. काय प्रकरण हाय?
प्रकरण. या शब्दाचा असा दबाव जोरात असतो खेडय़ात. दोस्त लगेचच गंमत करायला चाल करतात. घरची लोकं गावातली लोकं तर लांबचाच विषय. 
अलीकडच्या काळात ही भीती, हा दबाव, खेडय़ातला समाज ही परिस्थिती तशी थोडीबहुत नाही म्हणायला बदलत चाललीय. खेडय़ात आंतरजाती-धर्मीय लग्न होतात, नाही असं नाही. पण अशी ही धाडशी प्रयोगशील मंडळी अत्यंत कमी दिसतात. तसं त्यांच्याकडून इतर लोकं प्रोत्साहित होत असतात. पण गावातल्या बहुतांश लेकरांचं जुळणं, पहिलं प्रेम होणं, पहिल्या प्रेमाचं लग्न ठरणं, त्यामुळे शेवटचा ब्रेकअपचा ‘माझ्यापेक्षा चांगली मिळल !’वाला फोन येणं, त्यानंतर त्या दुर्‍खात गडी रमणं, नंतर चांगलीच्या शोधात फिरणं, चांगली मिळणं, परत त्या चांगलीचंही ठरतं, मग तिचाही शेवटचा फोन येतो, ‘देवानं तुझ्यासाठी कुणाला तरी स्पेशल बनवलंय !’
एवढी सर्व झक मारल्यानंतर कुठतरी नोकरीला चिकटून हळूच मांजरीगत मग पोरगं आईबापाजवळ जाऊन विचारतं, छापता काय बायोडाटा?
असा गोलगोल प्रवास होणारी गावात साधारणतर्‍ 50 टक्के प्रकरणं असतात.
   दुसरीकडे गावातील मुलींच्या भाषेचा अभ्यास केला तर काय दिसतं? त्या सुरुवातीला प्रेमात पडतात किंवा परश्यागत कोणतरी पोरगा सगळी कामधंदं सोडून पळत येऊन त्यांच्या प्रेमात पडतो तेव्हा त्यांची भाषा ही गावातल्या पोरीसारखी असते. हळूहळू प्रेमाचे दिवस सरू लागतात तशी त्यांची भाषा टीव्ही मालिकेतल्या मुलीसारखी होत जाते.
गडी लोकांच्या प्रेमाची सुरुवातही अशीच भारी असते. 
केसाला तेल लावणारा जेल लावू लागतो, पावडरीवरून क्रीमवर येतो, रोजच्या रोज दाढी करणारा वाढवू लागतो, वाढवणारा रोज स्वच्छता अभियान राबवू लागतो. ती जे म्हणते तसा हा बदलला असा सारखा त्याचा विकास होण्याचा हा काळ असतो. 
पण मग काही दिवसांनी एकच फाटकी जीन्स आणि वरचे बदलत जाणारे टी-शर्ट दिसू लागतात तेव्हा यांचा विकास मंदावला किंवा थांबला असं शास्नप्रमाणे म्हणलं जातं. 
प्रेमसंबंध  यातला ‘संबंध’ याला विशेष महत्त्व असतं. काही प्रेमं ही संबंधासाठी होतात, काही नाही. मात्र प्रेम सक्सेस होणं म्हणजे लग्न लागणं अशी व्याख्या अजूनही आहे. जिच्या/ज्याच्याबरोबर प्रेम केलं त्याच्याबरोबर लग्न झालं तर ते प्रेम सक्सेस झालं असा साधारण प्रेमाचा सिद्धांत असतो. ग्रामीण तरुण-तरुणींच्या यशस्वी प्रेमाचं प्रमाण हे 15-20 टक्के याहून जादा नाही. शंभर जोडप्यातले मधले 15-10 जणच असे यशस्वी होतात. बाकीच्यांचा पुनर्जन्मावर विश्वास असतो.
 हे प्रमाण एवढं कमी का? 
ग्रामीण भागात आजही जात-धर्म-कुळ-पोटजात-कुंडली, आर्थिक परिस्थिती, भोवतालचं वातावरण, घरचा दबाव, ऑनर किलिंगचा धाक अशा अनेक गोष्टी ग्रामीण तरु णाईचा पिच्छा सोडत नाहीत. जे 15-20 लोक असतात त्यातले 10 टक्के लोक हे जातधर्मातच गेलेले असतात. अतिशय धाडशी प्राणी हे बोटावर मोजण्याइतपत 5 टक्के दुर्मीळ असतात. विरोध झुगारून लग्न केलं तर बाहेर पडून आपण व्यवस्थित आपली आणि जोडीदाराची काळजी घेऊ शकेन का? आपल्याला समाजातून बाहेर काढलं जाईल का? आपल्या लग्नानंतर घरचे आई-वडील जिवाचं काही करून घेतील मा? ते एवढे हळवे नसले तर आपल्यालाच हाणतील काय? पोलीस स्टेशनाला काय होईल? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेमपोरांना वास्तवात घेऊन येतात.
त्यात धीर खचणारे लोक संमतीनं लग्नपूर्व काडीमोड घेतात. एकमेकाला पुढल्या जन्मात तुझ्यासाठीच वगैरे हळवी वचनं देतात- घेतात. पुढचं आयुष्य आठवणीत कुढत काढतात. यापेक्षा वाईट म्हणजे काहींना हा धक्काच सहन न झाल्यानं ते कायमची ही पृथ्वी सोडून जातात. यातून जे खरंच धाडसी असतात. ते पुढं जाऊन यशस्वी होतात.
विरोध कसा होतो?
मुलाच्या घरच्यांकडून विरोध होतो; पण तो मुलीकडच्यांएवढा तीव्र नसतो. विरोध फार म्हणून या सर्वातून माघार घ्यायला मुली पुढं असतात. तसंही त्या त्यांचं घर-आईवडील सोडून, समाजाचा विरोध पत्करून येणार असतात, त्यांना सुरक्षिततेची, काळजीची हमी देण्यात मुलं कमी पडतात. मग तिथं ते प्रकरण संपतं.
मुलं कमी पडतात कारण मुलांवरही दबाव असतो तो मुख्यतर्‍ आर्थिक अडचणींचा. आज रोजी घरातून बाहेर पडून सेटल होणं हे काही सोपं राहिलेलं नाही. म्हणून मग मुलं आर्थिक काळजीपोटी माघार घेतात. यात चूक-बरोबर काय नसतं. पण यासार्‍यात जे भावनेचं वाट्टोळं होतं ते भरून निघायला कैक वर्षे जातात किंवा कधी भरूनही निघत नाही. 
 आज सुदैवाने समाजातील काही लोक पुढे झालेत, ते स्वतर्‍हून अशा जोडप्यांच्या विवाहाला मदत करतात. सेलिब्रिटी म्हणवणारे अभिनेते, क्रि केटर, राजकीय लोकही आंतरधर्मीय जातीय लग्न करालेत. ही बाब नक्कीच आशादायी आहे. तसंही हे जग तडजोडीवर, विश्वासावर, प्रेमावर, मायेवर चालत असतं आणि समाजातल्या दर्‍या कमी व्हाव्यात असं वाटणं ही चांगली गोष्ट
व्हॅलेण्टाइन आठवडय़ात खपणारे गुलाब सदैव टवटवीत राहोत.. अजून काय पाहिजे?


(लेखक उच्चशिक्षित, तरुण प्रगतिशील शेतकरी आहेत.)
 

Web Title: love stories in rural Maharashtra & social norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.