मृत्यूच्या छायेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:48 AM2017-07-27T01:48:45+5:302017-07-27T01:48:47+5:30
घाटकोपरमधील साई दर्शन इमारत कोसळल्याने नवी मुंबईमधील ३१५ धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेरूळमध्ये स्लॅब कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे.
घाटकोपरमधील साई दर्शन इमारत कोसळल्याने नवी मुंबईमधील ३१५ धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेरूळमध्ये स्लॅब कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावला नाही तर इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या इमारतींमध्ये वास्तव्य करणाºया २ लाख नागरिकांना रोजचा सूर्योदय पुनर्जन्म असल्याचा भास होत आहे. पुनर्बांधणी झाली नाही, तर इमारती कोसळून मृत्यूचे तांडव होण्याची भीतीही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये नियम धाब्यावर बसवून शेकडो इमारतींचे बांधकाम केले जात आहे. माथाडी व अल्प उत्पन्न गटातील बैठ्या चाळींच्या जागेवर तीन व चार मजल्यांचे बांधकाम केले जात आहे. झोपडपट्ट्यांमध्येही तीन स्लॅबचे बांधकाम केले जात आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम करणाºया नागरिकांना नियम पाळण्याचे कोणतेच बंधन ठेवले जात नाही; परंतु ज्या नागरिकांनी आयुष्याची कमाई खर्च करून नवी मुंबईमध्ये २५ ते ३० वर्र्षंपूर्वी घरे विकत घेतली. एक इंचही अनधिकृत बांधकाम केले नाही व भविष्यातही अतिक्रमण न करण्याचा निर्णय घेऊन धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी रीतसर पाठपुरावा सुरू केला आहे. अशा २ लाख प्रामाणिक नागरिकांवर मृत्यूचे सावट निर्माण झाले आहे. वाशीतील श्रद्धा, एकता, पंचरत्न, नेरुळमधील दत्तगुरूसह शहरातील सर्वच धोकादायक इमारतींमधील रहिवासी वर्षानुवर्षे सिडको, महापालिका व राज्य शासनाच्या कार्यालयांच्या पायºया झिजवत आहेत. आम्हाला आमच्या घरांची पुनर्बांधणी करण्याची परवानगी द्या, आमची घरे कोणत्याही क्षणी कोसळतील. कुटुंबासह सर्वांचा मृत्यू होईल, असा टाओ फोडला जात आहे; परंतु सरकारी यंत्रणेला अद्याप जाग येत नाही. नेरुळमधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये अपघात होऊन बनुबाई लोंढे या महिलेचा मृत्यू झाला. धोकादायक इमारतीचा पहिला बळी ठरला असून, भविष्यात इमारती कोसळण्याचे सत्र सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटची स्थिती बिकट झाली आहे. मॅफ्को मार्केटमधील व्यापार थांबवून शेडमध्ये स्थलांतर करण्यात आला आहे. नागरिकांना पर्याय नसल्याने धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. मुंबईतील साई दर्शन सोसायटीमध्ये अपघात झाल्यापासून नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत. आपल्या इमारती अशाच कोसळतील. सर्वांचा मृत्यू होईल, या कल्पनेने झोप उडाली आहे. पाऊस पडायला सुरुवात झाली की नागरिकांना झोप येईनाशी झाली आहे. सकाळी कामावर गेलेल्या नागरिकांना सायंकाळपर्यंत कुटुंबीय सुरक्षित असतील का? याविषयी खात्री राहिलेली नाही.
पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत पिढीचा अंत
नवी मुंबईतील अनेक सोसायट्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला आहे. अनेक इमारतींमधील रहिवासी १५ ते २० वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत असून पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत आर. कार्व्हलो, नारायण शिंदे, इसाक मनीकम, बनारसी पात्रे, रवींद्रनाथ नायर, भंडारीदेवी पालीवाल, शांतीबेन पटेल, लक्ष्मी नारायण म्हात्रे, मगन भालेराव व त्यांचे कुटुंब, राम स्वरथ सिंग, अनंत पाटील, सुरेश कुदळे, बसेरा, द्वारका कडू, आदम शेख, गिरीश सिंग, नजीर मोहमद, आशा हुले, गौतमकुमार दत्ता, शिखा दत्ता, केशव सोनावणे, नागेश कांबळे, सुनीलकुमार महेश्वरी, सखुबाई पोटे यांचा मृत्यू झालेला असून, अजून किती नागरिकांच्या मृत्यूची प्रशासन वाट पाहत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घाटकोपर येथील इमारत जमीनदोस्त प्रकरण घडल्यानंतर धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पनवेल महानगरपालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. पनवेल नगरपरिषद, पाच सिडको नोड तसेच २३ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३२ धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली आहे. कळंबोली नोडमध्ये १००, तसेच खांदा कॉलनी ए टाईपमध्येही धोकादायक इमारतीचा समावेश आहे. मात्र, सिडको नोड पालिकेकडे हस्तातरित केली नसल्याने सिडको नोडमधील धोकादायक इमारतींची यादी पालिकेकडे उपलब्ध नाही. या सर्व धोकादायक इमारतींमध्ये आजही हजारो रहिवासी वास्तव्यास आहेत. यामधील कळंबोली शहरात सिडकोने उभारलेले केएल-२मध्ये शेकडो घरे आहेत. सहा इमारतींचा समावेश असलेल्या या सिडकोच्या प्रकल्पात अनेक वेळा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. विशेष म्हणजे, या इमारतीमधील रहिवासी अतिशय अल्प उत्पन्न गटातील असल्याने शासनाच्या योग्य निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शहरातील गाव गावठाणांत बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. गरजेपोटीच्या नावाखाली टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती उभारताना बांधकामविषयक नियम व निकषांना हरताळ फासला गेला आहे. दाटीदाटीने उभारलेल्या या इमारतींचे बांधकाम दर्जाहीन असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. गावात जाणारे रस्ते हरवले आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्य पोहोचविण्यास संबंधित विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रामुख्याने जुहूगाव, बोनकोडे, कोपरी, घणसोली, गोठीवली, रबाळे या गावांत सर्वाधिक अनधिकृत बांधकामे उभारली आहेत.
पंचरत्नवासीयांनाही पुनर्बांधणीची प्रतीक्षा
नवी मुंबईमधील धोकादायक इमारतींमध्ये वाशीतील पंचरत्न गृहनिर्माण सोसायटीचाही समावेश आहे. चार इमारतींमध्ये ४८ कुटुंबांचे वास्तव्य. १९८६मध्ये सिडकोकडून घरे खरेदी केली; परंतु बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने काही वर्षांमध्येच घराला गळती लागली. महापालिकेने १५ वर्षांपूर्वी चारही इमारती धोकादायक ठरविल्या. तेव्हापासून प्रत्येक वर्षी पावसाळा जवळ आला की, तुमची इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे. इमारतीचा वापर तत्काळ थांबविण्यात यावा, अशी नोटीस दिली जात आहे; पण पाठपुरावा करूनही पुनर्बांधणीला मंजुरी दिली जात नाही.
वाशीमधील श्रद्धा गृहनिर्माण सोसायटीमधील ३६८ कुटुंबीयांची ३० वर्षांपासून ससेहोलपट सुरू आहे. यामधील २५६ कुटुंबीय अद्याप धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत.
११२ कुटुंब १६ वर्षांपासून संक्रमण शिबिरामध्ये राहत आहेत. पुनर्विकास रखडल्याने १७ जणांचा घर-घर करून मृत्यू झाला असून, आमची शोकांतिका कधी थांबणार? असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.
जुईनगर सेक्टर-२२मधील रेल्वे कॉलनी वसाहतीमध्ये जवळपास ६० इमारती आहेत. यामधील ३५ इमारतींमध्ये कामगार व अधिकारी परिवारासह वास्तव्य करत आहेत. उर्वरित इमारतींचे बांधकाम अर्धवट असून, काही धोकादायक असल्याने रिकाम्या केल्या आहेत. वापर सुरू असलेल्या इमारतींची स्थितीही बिकट आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळून शेकडो नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. यानंतरही महापालिकेने या इमारती धोकादायक घोषित का केल्या नाहीत. रेल्वे वसाहत बांधकाम सुरू असल्यापासून वादग्रस्त ठरली आहे. इमारती बांधणाºया ठेकेदाराविषयी झालेल्या मतभेदानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. अनेक इमारतींचे बांधकाम अर्धवट ठेवावे लागले. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने रेल्वे धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करत नाही. स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व ठाणे जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी येथील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे; परंतु प्रशासन ठोस निर्णय घेत नाही.
अवनीवासीयांची व्यथा
पावसाळा सुरू झाल्यापासून अवनी सोसायटीमधील १९२ सदनिकाधारकांची झोप उडाली आहे. वारंवार स्लॅबचा भाग कोसळत आहे. रहिवासी धोकादायक इमारतीची वारंवार दुरूस्ती व रंगरंगोटी करत आहेत; परंतु पूर्ण बांधकामच धोकादायक झाले आहे.