वेगाने निर्णय घेतले आणि स्वप्नांचे रूपांतर वास्तवात करता आले

By admin | Published: September 20, 2016 06:03 AM2016-09-20T06:03:03+5:302016-09-20T06:03:03+5:30

राज्याच्या विकासाचे, जनतेच्या आकांक्षांना अनुरूप वेगाने निर्णय घेणारे लोकाभिमुख सरकार साकार करण्याचा संकल्प मनाशी केला होता

Rapid decisions were made and dreams were converted into reality | वेगाने निर्णय घेतले आणि स्वप्नांचे रूपांतर वास्तवात करता आले

वेगाने निर्णय घेतले आणि स्वप्नांचे रूपांतर वास्तवात करता आले

Next

सुरेश भटेवरा,
जयपूर- राजस्थानचे मुख्यमंत्रीपद दुसऱ्यांदा स्वीकारले, तेव्हा राज्याच्या विकासाचे, जनतेच्या आकांक्षांना अनुरूप वेगाने निर्णय घेणारे लोकाभिमुख सरकार साकार करण्याचा संकल्प मनाशी केला होता. सरकारच्या कारकिर्दीला ३ वर्षे पूर्ण होत असतांना यापैकी अनेक स्वप्नांचे रूपांतर वास्तवात झाले आहे. राजस्थानची जनता सरकारच्या कामकाजावर खुश आहे. राज्यात कुठेही हिंडलात, कोणाशीही बोललात तरी लगेच त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल. याचे कारण साऱ्या देशात क्रांतीकारी ठरणाऱ्या अनेक योजना माझ्या सरकारने कसोशीने राबवल्या... राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत आत्मविश्वासाने सांगत होत्या. अर्ध्या तासाच्या मुलाखतीत राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामकाजाचा भलामोठा पटच त्यांनी थोडक्या शब्दांत उलगडून दाखवला.
तुमच्या सरकारचा ३ वर्षांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य काय? याचे उत्तर देताना उत्साहाने राजे म्हणाल्या, खरे तर अनेक योजनांचा उल्लेख मला करता येईल. तथापि सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या योजनेबद्दल बोलायचे तर मला सर्वप्रथम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि राज्यातल्या महिलांच्या खऱ्या अर्थाने सशक्तिकरणास कारणीभूत ठरणाऱ्या भामाशाह योजनेचा उल्लेख करावा लागेल. देशात आधार कार्ड संकल्पनेचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा २00८ साली सरकारी योजनांचे थेट लाभ पारदर्शी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणारी भामाशाह योजना अमलात आणण्याचे आम्ही ठरवले. राजस्थानातील प्रत्येक कुटुंबाला आधार मानून त्यांच्या आर्थिक समावेशाचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत, रेशन कार्ड, पेन्शन, नरेगा, उच्च व तंत्रशिक्षणाच्या शिष्यवृत्त्या यासारख्या विविध योजनांच्या लाभार्थींना सरकारने सहभागी केले.
आता बँकांच्या शाखा, ई-मित्र व एटीएमखेरीज राजस्थानच्या जिल्हा, ब्लॉक व ग्रामपंचायत स्तरावर उघडलेल्या माहिती तंत्रज्ञान संपर्क केंद्रांद्वारे विविध योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा इरादा आहे. १५ आॅगस्ट २0१४ साली सुरू करण्यात आलेल्या भामाशाह योजनेत आजवर १00.२९ लाख कुटुंबे व ३३९.८२ लाख व्यक्तिंचा समग्र डेटाबेस सरकारने तयार केला आहे. भामाशाह कार्ड आणि बँकेची खाती लिंक करण्यात आली असून, कुटुंबाच्या खात्याचे प्रमुखपद घरातल्या महिलेकडे आहे. भामाशाह योजनेच्या एकाच कार्डावर ती तिला रेशन घेता येते, एटीएममधून पैसे काढता येता आणि विविध सरकारी योजनांचे थेट लाभही तिच्या पदरात पडतात. पॅन वा आधार कार्डासारखे हे कार्ड नसून, राज्यातल्या जनतेला विविध लाभ मिळवून देणारे चलनी नाणेच बनले आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
देशातच नव्हे तर जगभर या योजनेचे यश क्रांतीकारी ठरणार आहे, असे सांगताना त्या म्हणाल्या, देशात विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या राज्यांच्या यादीत राजस्थानचा समावेश व्हावा, यासाठी माझ्या सरकारने अनेक लक्षवेधी उपक्रम सुरू केले आहेत. थोडक्यात त्याचा उल्लेख करणे सोपे नाही. तरीही रिसर्जंट राजस्थान समिटच्या माध्यमातून ३ लाख ३0 हजार कोटींचे करार करून जी गुंतवणूक राज्यासाठी आम्ही मिळवली. त्याचे लाभ या भूमीवर लवकरच दिसू लागतील. ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाद्वारे अशा दुर्गम भागांपर्यंत आम्ही पोहोचलो जिथे आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी गेला नव्हता. ‘न्याय आपल्या दारी’ कार्यक्रमाद्वारे वर्षानुवर्षे प्रलंबित महसुली प्रकरणांचे निस्तारण अल्पावधीत शक्य झाले. ‘तुमचा जिल्हा, तुमचे सरकार’द्वारे जिल्ह्यांच्या समस्यांचे वास्तव आम्ही न्याहाळले व त्यांचे अग्रक्रम बदलून आवश्यकतेनुसार जुन्या योजनांचे रूपांतर नव्या सक्षम योजनांमधे आम्ही केले.
रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम अत्यंत जिद्दीने राबवला जातोय. कामगारांना दिलासा देण्यासाठी श्रम कायद्यात महत्त्वाचे बदल केले. अप्रासंगिक व कालबाह्य ठरलेले २४८ कायदे आम्ही रद्द केले. ग्रामीण भागात रेशनच्या धान्याबरोबर घरगुती वापराच्या ब्रँडेड वस्तू मिळाव्यात, यासाठी सरकारने ५ हजार स्वस्त धान्य दुकानांचे रूपांतर नव्या अन्नपूर्णा भांडारात करण्याची योजना राबवली आहे. खासगी क्षेत्रात बिग बझार चालवणाऱ्या फ्युचर ग्रुपशी त्यासाठी करार केला आहे. बहुतांश गावांत २४ तास वीजपुरवठा सुरू झाला आहे. पाणी संकटाचे निवारण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांचे काम सुरू आहे, ही माहिती वसुंधरा राजे यांनी दिली.
राज्य सचिवालयाच्या २१२ स्थानांखेरीज अन्य सरकारी इमारती व आमेर महल सह ३६६ ठिकाणी तसेच ब्लॉक स्तरावर २९१ ठिकाणी व्हाय फाय, हॉट स्पॉटची सुविधा दिली आहे. जिल्हा मुख्यालयात आजवर कार्यरत असलेली व्हिडिओे कॉन्फरन्सिंगची सोय आता ७५00 ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचली आहे.आमचे काम लोक पाहत आहेत. त्यांचा विकास आमच्या कारकिर्दीत वेगाने घडेल, असा विश्वास त्यांना वाटतोय, असे सांगून वसुंधरा राजे म्हणाल्या की, वेगाने निर्णय घेणारे व प्रत्यक्ष केलेले काम दाखवू शकणारे सरकार ही ख्याती माझ्या सरकारने तीन वर्षात मिळवली आहे.
>२४ तास वीजपुरवठा; ५ हजार स्वस्त धान्य दुकाने
रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम अत्यंत जिद्दीने राबवला जातोय. कामगारांना दिलासा देण्यासाठी श्रम कायद्यात महत्त्वाचे बदल केले. अप्रासंगिक व कालबाह्य ठरलेले २४८ कायदे आम्ही रद्द केले.
ग्रामीण भागात रेशनच्या धान्याबरोबर घरगुती वापराच्या ब्रँडेड वस्तू मिळाव्यात, यासाठी सरकारने ५ हजार स्वस्त धान्य दुकानांचे रूपांतर नव्या अन्नपूर्णा भांडारात करण्याची योजना राबवली आहे.खासगी क्षेत्रात बिग बझार चालवणाऱ्या फ्युचर ग्रुपशी त्यासाठी करार केला आहे. बहुतांश गावांत २४ तास वीजपुरवठा सुरू झाला आहे. पाणी संकटाचे निवारण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांचे काम सुरू आहे, ही माहिती वसुंधरा राजे यांनी दिली.

Web Title: Rapid decisions were made and dreams were converted into reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.