ना'पाक' कृत्य सुरुच, भारताचा जवान शहीद
By Admin | Published: July 22, 2014 01:34 PM2014-07-22T13:34:59+5:302014-07-22T13:38:15+5:30
सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे सत्र सुरुच ठेवले असून मंगळवारी पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे.
ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. २२ - सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे सत्र सुरुच ठेवले असून मंगळवारी पाक सैन्याने अखनूर सेक्टर येथे भारतीय चेक पोस्टवर गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी पाक सैन्याने भारतीय हद्दीतील अखनूर सेक्टर येथील चकला पोस्टवर गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला. या घटनेनंतर सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यातही पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. तर शनिवारी रात्रीही पाकिस्तानने १२ भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता.
मंगळवारी राज्यसभेत पाककडून होणा-या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा विषय उपस्थित झाला होता. यावर उत्तर देताना संरक्षण मंत्री अरुण जेटली म्हणाले, भारताची मान शरमेने खाली झुकू देणार नाही. पाकला योग्य उत्तर दिले जाईल. राज्यसभेत जेटली उत्तर देत असतानाच पाकने भारताच्या सैन्यावर गोळीबार केला आहे. त्यामुळे आता भारत पाकला काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.