ेलोकसभेच्या पराभवाचे पडसाद मिनी मंत्रालय
By admin | Published: May 21, 2014 10:55 PM2014-05-21T22:55:19+5:302014-05-21T22:59:47+5:30
युतीची पदाधिकार्यांच्या राजीनाम्याची मागणी, उपाध्यक्षांनी उडविली खिल्ली
युतीची पदाधिकार्यांच्या राजीनाम्याची मागणी, उपाध्यक्षांनी उडविली खिल्ली
नाशिक : लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले. जनतेने कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारला नाकारले असून, जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांनीही त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी त्या मागणीची खिल्ली उडवित विधानसभेपूर्वी आम्ही राजीनामे देणारच आहोत, असे सांगताच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हशा पिकला.
भाजपाचे केदा अहेर व शिवसेनेचे प्रवीण जाधव यांनी लोकसभेच्या पराभवाने केंद्रांत व राज्यातील राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या सरकारला नाकारले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पदाधिकार्यांनीही त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे द्यावे, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्ष जयश्री पवार यांनी आमचे राजीनामे मागण्यासाठी आमचे वरिष्ठ आहेत, त्याची तुम्ही काळजी करू नका, असे प्रवीण जाधव यांना सुनावले. शैलेश सूर्यवंशी यांनी देशात आम्हाला नाकारले आहे, मात्र राज्यात व जिल्हा परिषदेत आम्हालाच निवडून दिल्याचे सांगितले. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी या राजीनाम्याच्या मागणीची खिल्ली उडवित आम्ही विधानसभा संपल्यावर राजीनामे देणारच आहोत, तोेपर्यंत राहू द्या, असे सांगताच सभागृहात हशा पिकला. त्याचवेळी डॉ. प्रशांत सोेनवणे व प्रा अनिल पाटील यांनी आम्हाला जनतेने पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. जिल्हा परिषद तशीही तुमच्याच मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्यामुळे तुम्हीच जास्त जबाबदार असून, आधी तुम्ही राजीनामे द्या, असे खोचकपणे सांगितले. प्रशांत देवरे यांनी जिल्हा परिषद अशीही काळू-बाळू चालवितात, गेल्या अडीच वर्षांत हाच तमाशा सुरू आहे, असे सांगितले. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी पुन्हा हस्तक्षेप करीत पराभवाची जबाबदारी सोेनिया गांधी व राहुल गांधी यांनी घेतली असून, आम्ही अडीच नव्हे तर पाच वर्षे पदावर राहू, असे सांगताच सभागृहात पुन्हा हशा पिकला.(प्रतिनिधी)
..तर छत्रपतींचे नाव घेऊ नका
नैतिकच्या गप्पा मारणार्या भाजपा-सेना या पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण केले. मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहाला साधे नाव का देता येत नाही, असा टोमणा प्रा. अनिल पाटील यांनी मारला. तसेच नाव देणार नसाल तर छत्रपतींचे नाव घेऊ नका, असेही बैठकीनंतर स्पष्ट केले.