नाशिकमध्ये ‘खाकी’ चा दरारा कमी झाला की काय?

By विजय मोरे | Published: October 20, 2018 03:17 PM2018-10-20T15:17:59+5:302018-10-20T15:32:58+5:30

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणा-या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचा-यांवर हल्ले झाले असून यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नसलेल्यांकडून पोलीस कर्मचा-यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण तसेच पोलीसांच्या वाहनाची तोडफोड करण्यापर्यंत मजल गेली आहे़ त्यामुळे आता पोलीस या शब्दाचा दरारा निर्माण करण्याची गरज आहे़

What is the deterioration of Khakee? | नाशिकमध्ये ‘खाकी’ चा दरारा कमी झाला की काय?

नाशिकमध्ये ‘खाकी’ चा दरारा कमी झाला की काय?

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्यांवर वाढते हल्लेसाडेचार वर्षांत १७४ गुन्हे पोलिसिंगची आवश्यकता

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणा-या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचा-यांवर हल्ले झाले असून यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नसलेल्यांकडून पोलीस कर्मचाºयांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण तसेच पोलीसांच्या वाहनाची तोडफोड करण्यापर्यंत मजल गेली आहे़ त्यामुळे आता पोलीस या शब्दाचा दरारा निर्माण करण्याची गरज आहे़

देशातील अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम पोलीस दलाकडून केले जाते़ पोलीस या शब्दाचा दराराच इतका होता की, केवळ पोलिसाचे नाव काढले किंवा पोलिसांत तक्रार करतो असे म्हटले तरी वाद मिटत होते़ मात्र, कालौघात या पद्धतीत बदल झाला असून त्यास बेजबाबदार नागरिकच नव्हे तर पोलिस यंत्रणाही तितकीच जबाबदार आहेत़ रात्रीच्या वेळी टवाळखोरांवर केली जाणारी कारवाई आता थंड पडली पडल्याचे चित्र आहे़

कायद्याचे ज्ञान हे पुर्वीपेक्षा चांगले असून कायदा तोडल्यानंतर होणारी परिणामांचीही नागरिकांना जाणीव आहे़ बदलत्या काळानुसार पोलिसांकडून विविध प्रबोधनात्मक लोकाभिमुख उपक्रम राबवले जात असून ही चांगली बाब असली तरी पोलिस या शब्दाचा धाक टिकविणेही तितकेच गरजेचे आहे़ अन्यथा, पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल़



अजामीनपात्र गुन्हा
कर्तव्यावर असलेले पोलीस वा सरकारी कर्मचा-यांवर हल्ला वा मारहाण केल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो़ अजामीनपात्र असलेला गुन्हा असलेल्या या केसेस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालत असत़ मात्र, आता हा गुन्हा गुन्हा सेशन ट्राएबल करण्यात आला तीन वर्षांची शिक्षा ही पाच वर्ष करण्यात आली आहे़
 


सरकारी कर्मचा-यांवरील हल्ले (दाखल गुन्हे)
----------------------------------------------------
वर्षे            पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे           उकल
----------------------------------------------------
२०१५                ३९                                          ३९
२०१६               ५०                                           ४७
२०१७               ५३                                           ५२
२०१८               ३२ (जाने ते आॅगस्ट)                 ३२
----------------------------------------------------
४ वर्षे               १७४                                         १७०
----------------------------------------------------


पोलीस कर्मचा-यांवरील हल्ल्याच्या काही घटना

* १० फेब्रुवारी २०१८ वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई झनकर यांनी इंदिरानगर बोगद्याजवळ नो इंट्रीमध्ये कार चालविणारे संशयित अशोक आहेर, सोमनाथ गायकवाड यांना हटकले असता या दोघांनी शिवीगाळ तसेच मारहाण केली होती़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

* १२ मार्च २०१८ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर तिडके व हारुण सय्यद हे आकाशवाणी टॉवरजवळील नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करीत होते. यावेळी दुचाकीची टोर्इंग केलेली नसतानाही संशयित शेखर बर्डे यांनी हुज्जत घातली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

* ८ मे २०१८ सहायक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी व त्यांचे सहकारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फुलपाखरू देशी दारू दुकानात देशी दारूच्या दुकानात तपासणी व पंचनामा करण्यासाठी गेले असता संशयित राजेश मारू व भावना मारू यांनी शिवीगाळ केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

* २२ मे २०१८ नाशिक - पुणे महामार्गावरील उपनगर नाका सिग्नलवर सिग्नल तोडल्याने संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला यास पोलीस नाईक डी़एल़ शहाणे व पोलीस हवालदार मधुकर सोनवणे यांनी हटकले असता त्यांना मारहाण करण्यात आली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

* ३ आॅगस्ट २०१८ पंचवटी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल संदीप पोटिंदे व पोलीस शिपाई शेळके हे हिरावाडीतील एसएसडीनगरमध्ये रात्रीच्या सुमारास गस्त घालीत होते़ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मध्य विधानसभेचे मद्यधुंद अध्यक्ष संशयित धीरज मगर (रा़ हिरावाडी) यांना हटकले असता शिवीगाळ केली़ त्यामुळे पोलीस ठाण्यात आणले असता गोंधळ घालून पोलीस निरीक्षक ढमाळ व पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

* २५ सप्टेंबर २०१८ सहायक पोलीस उपनिरीक्षक बबन थेटे व पोलीस शिपाई रिक्षाचालकांमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी गेले असता रिक्षाचालक संशयित स्वप्नील रणमाळे (रा. पंचवटी) याने सराईत गुन्हेगाराच्या नावाने धमकी देत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना पंचवटीतील मालेगाव स्टॅण्डवर घडली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

* १० आॅक्टोबर २०१८ जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या संशयित रवी वाघमारे, सचिन सोनवणे यांना पोलीस शिपाई योगेश परदेशी यांनी हटकले असता या दोघांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

 

लष्करी अधिका-यांचा पोलीस ठाण्यावर हल्ला
तोफखाना केंद्रातील प्रशिक्षणार्थी अधिकारी हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यासोबत तक्रार देण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्यात गेला होता़ यावेळी प्रवेशद्वारासमोर लावलेल्या वाहनावरून पोलीस अधिका-याने सूचना केली असता लष्करी अधिका-याने हुज्जत घातल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यामुळे संतप्त झालेल्या तोफखाना केंद्रातील १०० ते १५० प्रशिक्षणार्थी जवानांनी जानेवारी २०१५ मध्ये उपनगर पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला होता़ पोलीस ठाण्याची तोडफोड करत काही पोलीस कर्मचा-यांना जबर मारहाण करण्यात आली होती़

 

मानसिकता बदलणे गरजेचे

शहरातील वाढते अपघातांना आळा बसावा यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांची काटेकोट अंमलबजावणी केली जात असल्याने अपघातांना काही अंशी आळा बसला असून अनेकांचे प्राण वाचले आहेत़ याबरोबच शहरातील विविध महाविद्यालये, शाळांमध्ये पोलीस अधिकारी जाऊन प्रबोधन करीत आहेत़ पोलिसांवर हल्ले करणाºयांची कोणत्याही प्रकारची गय न करता कायदेशीर कारवाई केली जाते़ पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत संबंधिताची मजल का गेली याचादेखील अभ्यास केला जातो़ पोलिसांवरील हल्ले करण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे़
- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक़

Web Title: What is the deterioration of Khakee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.