तडजोडीतच जीवनाच्या सुखाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:01 AM2018-05-15T01:01:10+5:302018-05-15T01:01:10+5:30
आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या.
नाशिक : आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या. जनलक्ष्मी बॅँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तुळसाआई बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाच दिव्यांग जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावळी या दिव्यांगांनी आपल्या भावना प्रकट केल्या. तडजोडी स्वीकारल्यास दिव्यांना जीवन जगणे सुलभ होते. दोघांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे साथ दिली पाहिजे, अशा भावना अंध दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या. यावेळी एनजीओ फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिव्यांग व्यक्तींचे जीवन जगणे आणि त्यांना जगविणे फार कठीण काम असते. दिव्यांगांचे विवाह जुळविताना तर अनेक अडचणी येतात. त्यावर मात करीत हा प्रश्न तडीस न्यावा लागतो. सामाजिक भावनेचा प्रश्न अशा संस्थांसमोर नेहमी असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. सिंधू काकडे यांनीही मार्गदर्शन केले. दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रसंगी लढा उभारण्याची वेळ आल्यानंतर सर्वांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही मुनशेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी संगीता बुथकर, किशोर काळे, कैलास गोडसे, डॉ. संगीता पवार, किरण तुपलोंढे, शशांक हिरे उपस्थित होते. याप्रसंगी साळुंखे, बैसाने, काशीनाथ पाडवी, नितीन निर्मळ, रेखा साळुंके, घनदाट यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शोभा काळे यांनी प्रास्ताविक केले तर संगीता पवार यांनी आभार मानले.
यावेळी सूर्यभान साळुंके, नितीन घनदाट, शारदा व शैलेश बैसाने, कैलास निर्मळ यांनी अनुभव कथन केले. दिव्यांगांच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी आणि सत्य स्वीकारणे अपेक्षित असते. आपल्या मर्यादा ओळखून आपल्या इच्छांना आळा घालता आले पाहिजे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच्या क्षणांचा समरस होऊन सामना केला, तर जोडीदार कोणीही असो जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही, अशादेखील भावना दिव्यांग व्यक्तींनी व्यक्त केल्या.