गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला चाबकाचाही फरक पडणार नाही, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 09:31 PM2018-02-17T21:31:06+5:302018-02-17T21:31:06+5:30
सत्तेत जर गेंडा असेल तर या चाबकाने त्याचं करायचं काय? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला केला.
नाशिक ( निफाड ) – बऱ्याच दिवसाने चाबूक हातात आला असून या चाबकाला एकवेळ बैल बुजतो आणि कधी वाघ समोर आला तर चाबकाला घाबरतो परंतु सत्तेत जर गेंडा असेल तर या चाबकाने त्याचं करायचं काय? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला केला.
शनिवारी (17 फेब्रुवारी ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा दिवस होता. यावेळी निफाडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी चाबूक भेट दिला. त्या चाबकाचा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी चाबकाचे फटकारे सरकारवर ओढले. या देशात आणि राज्यात महागाईचा आगडोंब उसळला आहे. रेशनवरील डाळ, साखर, तांदुळ, रॉकेल जनतेचं सरकारने बंद केलं आहे आणि दुसरीकडे जो मका आपण गाई-गुरांना खायला घालतो तो मका हे मोदी-फडणवीस आपल्याला खाऊ घालत आहेत. त्यामुळे जनतेने काय करायचं याचा विचार करायला हवा असेही मुंडे म्हणाले.
त्यांनी आपल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम याचा समाचार घेतला. आज त्याला अटक कराल, त्याला पक्षातून निलंबितही केले आहे, त्याला आतमध्ये काही दिवस ठेवाल. परंतु महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या छिंदमची जीभच छाटली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. कोणीही पण उठून काहीही बोलत आहे. आणि त्याविरुध्द आंदोलन करणाऱ्या आमच्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. पोलिसांना मी सांगू इच्छितो, आमच्या लोकांना त्रास देवू नका, मौका सभी को मिलता है, वेळ आमचीही येणार आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळी शोलेमधील धर्मेद्राचा डॉयलॉग आठवा,चुन चुन के मारेंगे असेही मुंडे यांनी भाषणात स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केला. आत्ताची शिवसेना ही शिवसेना नसून ती भिवसेना झाली आहे.त्यांनी आत्ता फलकावर वाघाच्या चिन्हाऐवजी शेळी नव्हे तर सशाचे चिन्ह लावावे असा सल्ला देतानाच शिवसेना सारखी सत्तेवर लाथ मारण्याची भाषा करत आहे. अहो सारखी लाथ मारणारा प्राणी कोण हे सर्वज्ञात आहे असा टोलाही लगावला.