महापालिका निकालाची लोकसभेत पुनरावृत्ती करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:43 AM2019-03-25T00:43:11+5:302019-03-25T00:43:38+5:30

नांदेड शहर आणि जिल्ह्यातील जनता काँग्रेसवर प्रेम करते. या माध्यमातून असलेले नांदेडमधील माझे वर्चस्व संपविण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात केली होती.

Let us repeat the municipal election in the Lok Sabha | महापालिका निकालाची लोकसभेत पुनरावृत्ती करू

महापालिका निकालाची लोकसभेत पुनरावृत्ती करू

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण : मरळक येथून काँग्रेसच्या प्रचाराला प्रारंभ

नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्यातील जनता काँग्रेसवर प्रेम करते. या माध्यमातून असलेले नांदेडमधील माझे वर्चस्व संपविण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात केली होती. मात्र नांदेडमधील सुजाण मतदारांनी भाजपाला त्यांची जागा दाखवित काँग्रेसला एकहाती सत्ता दिली. याच निकालाची पुनरावृत्ती नांदेडकर लोकसभा निवडणुकीतही करतील, असा विश्वास काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांनी केला.
तालुक्यातील मरळक येथील विमलेश्वर मंदिरात आघाडीच्या प्रचाराचा रविवारी नारळ फुटला. यावेळी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर आ. डी. पी. सावंत, आ. अमिता चव्हाण, माजी आ. रोहिदास चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ. सुनील चव्हाण, सुजया चव्हाण, श्रीजया चव्हाण यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रकाश पोफळे, पीआरपीचे राज्य उपाध्यक्ष बापूराव गजभारे, माजी आ. विजय खडसे, गणपतराव तिडके, बी. आर. कदम, कविता कळसकर, अनुजा तेहरा, शीला निखाते, सुखदेव जाधव, साहेबराव धनगे, अ‍ॅड. निलेश पावडे, जयश्री पावडे यांच्यासह पदाधिकारी- कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विमलेश्वराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ही ताकदच मला विजय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त करीत या भागात आल्यानंतर मला डॉ. शंकरराव चव्हाण व पद्मश्री श्यामराव कदम यांची आवर्जून आठवण येते, असेही चव्हाण यांनी नमूद केले. निवडणुका येतील-जातील परंतु जनतेशी माझे असलेले नाते अतूट असल्याचे सांगत हीच माझी ताकद असल्याचेही ते म्हणाले. राज्यामध्ये काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत ५६ पक्ष, संघटना जोडल्या गेल्या आहेत. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीच आम्ही एकत्रित आलो आहोत, याच हेतूने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराचे उंबरठेही आम्ही झिजविले. परंतु, त्यांच्या मनात नेमके काय आहे? ते आम्हाला कळाले नाही. ‘जागा कितीही घ्या, पण आघाडी करा’ अशी आमची भूमिका होती. मात्र नांदेड, बारामतीसह सोलापूरच्या जागावर वंचित आघाडीने उमेदवार जाहीर केल्याने आमच्यासमोर पर्याय नव्हता, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रारंभी आ. डी. पी. सावंत, बी.आर. कदम, प्रा. प्रकाश पोफळे, अब्दुल सत्तार, जयश्री पावडे यांची भाषणे झाली.
भाजपाला धडा शिकवा
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या हिताचा एकही निर्णय न घेता केवळ घोषणाबाजी करुन जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपाला मतदारांनी आता धडा शिकवावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. कर्जमाफीच्या कोट्यवधीच्या जाहिराती केल्या. प्रत्यक्षात याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगत बेरोजगारांचीही भाजपाने थट्टा केल्याचे ते म्हणाले. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाºया या सरकारने पेट्रोल, डिझेलची दरवाढ करीत अब्जावधी रुपयाची लूट केल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला़

Web Title: Let us repeat the municipal election in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.