नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:01 AM2018-08-09T01:01:50+5:302018-08-09T01:05:00+5:30

नांदेड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस आ. अमरनाथ राजूरकर यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर काँग्रेसबरोबरच सेना-भाजपाही आमनेसामने उभी ठाकली असून तिन्ही पक्षांतून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

Fare of allegations and reactions from Nanded South | नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Next
ठळक मुद्देराजकारण निघाले ढवळून : काँग्रेस-भाजप वादात सेनेचीही उडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस आ. अमरनाथ राजूरकर यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर काँग्रेसबरोबरच सेना-भाजपाही आमनेसामने उभी ठाकली असून तिन्ही पक्षांतून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
विष्णूपुरी येथे झालेल्या कार्यक्रमात खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे आ. राजूरकर यांनी विधान केले. असे झाल्यास काँग्रेसची एक जागा वाढेल. सोबतच नांदेड दक्षिणचाही विकास होईल, असे विधान त्यांनी केले होते. यावर शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी काँग्रेस आमदारावर टीकेची झोड उठविली. इतकी वर्षे जिल्ह्यावर वर्चस्व असताना नांदेडचा विकास काँग्रेसला का करता आला नाही? अशी टीका त्यांनी केली. जिल्हा परिषदेसह महानगरपालिकेवरही कॉंग्रेसची सत्ता असताना पुन्हा विकासासाठी काँग्रेस हवी, असे म्हणणे निरर्थक असल्याचे आनंद जाधव यांनी म्हटले होते.
दरम्यानच्या काळात आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका कार्यक्रमात मागच्यावेळी माझ्यामुळेच नांदेड दक्षिणमध्ये भाजपा उमेदवार पराभूत झाला. आता मीच भाजपाचा उमेदवार निवडून आणेन असे सांगत येत्या काळात जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व वाढलेले दिसेल, असा दावा आ. चिखलीकर यांनी केला. या व्यक्तव्याचाही जाधव यांनी समाचार घेतला.
नांदेड दक्षिणची जागा मतदार आणि निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच आम्ही जिंकली होती. त्यामुळे निवडून आणण्याबाबतचे फुकटचे श्रेय घेवू नये, असा टोला त्यांनी आ. चिखलीकर यांना लगावला होता.
दरम्यान, उपमहापौर विनय गिरडे यांनीही या वादात उडी घेतली आहे. चिखलीकरांना टीकेचे लक्ष्य करीत मनपा निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर भाजपाची जबाबदारी होती, ते ८१ पैकी केवळ ६ जागा निवडणूक आणू शकले. त्यांना स्वत:च्या पुतण्याला मनपा निवडणुकीत विजयी करता आले नाही. ते इतरांना पराभूत किंवा विजयी कसे करणार ? असा सवाल गिरडे पाटील यांनी केला आहे.
राज्यात जितके पक्ष आहेत ते सर्व पक्ष फिरून झाले आहेत. २०१९ पर्यंत कंधार-लोह्याचे हे आमदार भाजपमध्ये तरी राहतील काय ? असा प्रश्नही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
---
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीत मोठी चुरस होती. येथून शिवसेना निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाली होती. त्यामुळेच येवू घातलेल्या निवडणुकीसाठी या मतदारसंघावर प्रमुख पक्षांचा डोळा आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाची काँग्रेसने गुगली टाकल्यानंतर नांदेड-दक्षिणमधील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेसने खा. चव्हाण यांचे नाव घेवून विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. या बरोबरच पक्षांतर्गत इच्छुकांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे.

Web Title: Fare of allegations and reactions from Nanded South

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.