१० लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:17 AM2018-05-30T01:17:35+5:302018-05-30T01:17:52+5:30
पंतप्रधान ग्राम उद्योग योजनेंतर्गत १० लाखांचे कर्ज झटपट मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील टोळीने मानकापूर, गोधनीत राहणारे राजेश गणपतराव उंदीरवाडे (वय ४०) यांची २ लाख २५ हजारांनी फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान ग्राम उद्योग योजनेंतर्गत १० लाखांचे कर्ज झटपट मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील टोळीने मानकापूर, गोधनीत राहणारे राजेश गणपतराव उंदीरवाडे (वय ४०) यांची २ लाख २५ हजारांनी फसवणूक केली.
आकाश वर्मा, प्रवीण कुमार आणि ओमप्रकाश (सर्व रा. दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. २५ फेब्रुवारी ते ८ मार्च २०१८ या कालावधीत आरोपींनी राजेश यांना वारंवार फोन केले. आमची डायनामिक फायनान्स कंपनी आहे. तुम्हाला पंतप्रधान ग्राम उद्योग योजनेंतर्गत १० लाखांचे कर्ज झटपट मिळू शकते. व्याजाचा दरही फार कमी आहे, असे आरोपी सांगत होते. आरोपींच्या भूलथापांना बळी पडून राजेश यांनी आरोपींच्या खात्यात एकूण २ लाख २५ हजार ५०० रुपये जमा केले. प्रत्येक वेळी काही ना काही सांगून रक्कम जमा करायला सांगणारे आरोपी कर्जाची रक्कम मात्र उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे राजेश यांनी आपली रक्कम परत मागणे सुरू केले असता आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात आल्याने राजेश यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.