दादा व बाबांमुळे महाराष्ट्र खड्ड्यात - गडकरी
By Admin | Published: September 28, 2014 02:15 PM2014-09-28T14:15:06+5:302014-09-28T14:15:06+5:30
वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगार कसा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २८ - महाराष्ट्रात वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगाराच्या नवीन संधी कशा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंनी प्रचाराचा नारळ फोडला. नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींनी सभा घेतली. या सभेत गडकरींनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील आत्तापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीका नितीन गडकरींनी केली. काँग्रेसनेच जातीयवादाचे विष कालवले असे सांगत गडकरींनी सोनिया गांधींवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात शेतक-यांनी आत्महत्या का केल्या असा सवाल गडकरींनी शरद पवार यांना विचारला आहे. आघाडीमुळेच राज्य दिवाळखोरीला निघाले असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वांना समान न्याय हेच भाजपचे सूत्र असून हिनासारख्या १०० आदिवासी मुलींनी डॉक्टर व्हावे यासाठी भाजप प्रयत्न करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. आज दिवसभरात गडकरी उत्तर महाराष्ट्रात आणखी चार सभा घेणार आहेत. यासंपूर्ण सभेत गडकरींनी एकदाही शिवसेनेवर टीका केली नाही.