ख्यातनाम कवी, लेखक विंदा करंदीकर यांची जयंती

By Admin | Published: August 23, 2016 08:27 AM2016-08-23T08:27:50+5:302016-08-23T08:30:49+5:30

मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करदींकर यांची आज (२३ ऑगस्ट) जयंती

The birth anniversary of the famous poet, author Vinda Karandikar | ख्यातनाम कवी, लेखक विंदा करंदीकर यांची जयंती

ख्यातनाम कवी, लेखक विंदा करंदीकर यांची जयंती

googlenewsNext
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २३ - मराठीतील ख्यातनाम  कवी,  लेखक  व समीक्षक गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करदींकर यांची आज (२३ ऑगस्ट) जयंती. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा  एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार  त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर  आणि  कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना  महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान,  जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
 
कौटुंबिक
२३ ऑगस्ट १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला.  विंदाचे वडील विनायक करंदीकर  कोकणात  पोंभुर्ला  येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण  कोल्हापूर  येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले.  बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई,एस.आय.ई.एस. कॉलेज  इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.
 
विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.
 
विंदांचे समग्र वाङ्मय
विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणिवसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्य वाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषकांस परिचय झाला.
 
काव्यसंग्रह
स्वेदगंगा इ.स. १९४९ 
मृद्‌गंध इ.स. १९५४
धृपद इ.स. १९५९ 
जातक इ.स. १९६८
विरूपिका इ.स. १९८१ 
अष्टदर्शने इ.स. २००३) (या साहित्य कृतीसाठी  ज्ञानपीठ पुरस्कार)
 
संकलित काव्यसंग्रह 
संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)
 
बालकविता संग्रह
राणीची बाग 
एकदा काय झाले
सशाचे कान
एटू लोकांचा देश 
परी ग परी
अजबखाना
सर्कसवाला
पिशीमावशी आणि तिची भुतावळ 
अडम्‌ तडम्
टॉप
सात एके सात
बागुलबोवा
 
ललित निबंध
स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)
 
समीक्षा
परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
उद्गार (इ.स. १९९६)
 
इंग्लिश समीक्षा
लिटरेचर अ‍ॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)
 
अनुवाद
अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
राजा लिअर (इ.स. १९७४)
 
पुरस्कार आणि पदवी
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान १९९१
जनस्थान पुरस्कार १९९३
कोणार्क सन्मान १९९३
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) (इ.स. २००३)
केशवसुत पुरस्कारविद्यापीठांच्या डी.लिट्‌स
 
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
 
हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक--इ.स. २०११ : विजया राजाध्यक्षइ.स. २०१२ : के.ज. पुरोहितइ.स. २०१३ : ना.धों. महानोर
 
कवितांविषयी
विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणार्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणार्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.
 
“विंदांच्या 'मृ्द्‌गंध' या पॉप्युलर प्रकाशनाने १५ डिसेंबर १९५४ ला प्रसिद्ध केलेल्या पहिल्या आवृत्तीच्या मलपृष्ठावरून”
 
विंदांच्या शब्दात
विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता  विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.
१४ मार्च २०१० साली त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया व ईंटरनेट 
           

Web Title: The birth anniversary of the famous poet, author Vinda Karandikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.