समीरवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र

By admin | Published: December 15, 2015 01:01 AM2015-12-15T01:01:58+5:302015-12-15T01:04:29+5:30

७७ साक्षीदारांचे जबाब : शुक्रवारी न्यायालयात हजर करणार

392 page chargesheet on Sameer | समीरवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र

समीरवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक असलेला समीर गायकवाड याच्यावर सोमवारी ३९२ पानांचे दोषारोपपत्र कसबा बावडा रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्याकडे दाखल करण्यात आले. या दोषारोपपत्रामध्ये ७७ साक्षीदारांचे जबाब, समीरच्या दोन मैत्रिणी, एक मित्र, त्याने मोबाईलवरून इतरांना केलेल्या कॉलच्या संभाषणाचा प्रयोगशाळेने दिलेला अहवाल व त्याने ‘क्षात्रधर्म साधना’ हे पुस्तक वाचून त्या पुस्तकातील संदर्भांद्वारे गोविंद पानसरे यांच्या हत्येचा रचलेला कट, आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
समीरवर खून, खुनाचा प्रयत्न, हत्येचा कट रचणे, समान हेतू, असे भारतीय दंडविधान संहिता कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. व सहायक सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी डांगे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर डांगे यांनी (पान १ वरून) दोषारोपपत्रातील गुन्ह्यांचे वाचन करून त्यांची दखल घेत समीरवर समन्स जारी करा व शुक्रवारी (दि. १८) त्याला हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच भारतीय दंडविधान संहिता कलम १७३ (८) नुसार पानसरे हत्या प्रकरणातील कागदपत्रे, अन्य पुरावे गोळा करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना परवानगी दिली.
गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सागरमाळ येथे १६ फेबु्रवारी २०१५ला गोळीबार झाला होता. या गोळीबारामध्ये गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी मुकुंद दिनकर कदम (रा. प्रतिभानगर) यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार राज्य शासनाच्या विशेष तपास यंत्रणेचे (एसआयटी) प्रमुख संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यामध्ये १६ सप्टेंबर २०१५ रोजी सांगलीतील समीर गायकवाड (वय २९, रा. शंभर फुटी रोड, सांगली) याला ‘एसआयटी’ने अटक केली.
दरम्यान, गेले आठ दिवस संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी कायद्यातील विविध कलमांचा अभ्यास करून व वकिलांची मदत घेऊन समीर गायकवाडचे दोषारोपपत्र (चार्टशिट) तयार केले. सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख, दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) अभिजित देशमुख, सहायक सरकारी वकील चंद्रकांत बुधले हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामधून दोषारोपपत्र घेऊन बाहेर पडले.
ते कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आले. त्यांनी सहायक अधीक्षक एस. बी. मेथे
यांना पानसरे हत्येसंदर्भात माहितीची पडताळणी करण्यासाठी दोषारोपपत्र दिले. त्यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे,
अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी
गायकवाडच्या दोषारोपपत्राबद्दल चर्चा केली.
थोड्या वेळाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. न्यायालयात आले. त्यांनी वकिलांशी चर्चा केली. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात चैतन्या एस., सहायक सरकारी वकील बुधले, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, आदी आले. यावेळई चैतन्या यांनी डांगे यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर डांगे यांनी १० ते १५ मिनिटे दोषारोपपत्राचे वाचन केले. यावर समीरला समन्स जारी करण्याचे पत्र कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यांना पाठवावे व शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले. यानंतर चैतन्या यांच्यासह सर्वजण न्यायालयातून बाहेर पडले.

जबाब, छायाचित्रे व पंचनामा
या दोषारोपपत्रात मुकुंद दिनकर कदम यांचा फिर्यादी जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, घटनास्थळाच्या वस्तुस्थितीचे १८ छायाचित्रे, घटनास्थळाचा नकाशा, सरस्वती चुनेकर विद्यालयातील सीसीटीव्ही यंत्र जप्त, पानसरे यांच्या अंगावरील कपडे जप्त, जखमी उमा पानसरे यांच्या अंगावरील कपडे, फिर्यादी मुकुंद कदम यांचे कपडे,पानसरे यांच्या शरीरातील गोळीचा भाग, पानसरे यांच्या मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा व त्यासोबत गावदेवी पोलीस ठाणे मुंबई यांच्याकडील मृताची खबर, शवविच्छेदन पत्र, मृतदेह ताब्यात दिल्याची पावती, अ‍ॅस्टर आधार रुग्णालयाचे केसपेपर, एक्स-रे फिल्म जप्त, आरोपी समीर गायकवाड याच्या अटकेचा पंचनामा, त्याची घरझडती मुद्देमालाची तपासणी, गायकवाडच्या धर्मरथ रीडिंग बुक जप्तीचा पंचनामा तसेच रेकॉर्ड केलेल्या ध्वनिमुद्रित संभाषणाचा, समीरच्या आवाजाचा मोबाईल फोनवरील वाचनाचा ध्वनिमुद्रित झालेला आवाजाचा नमुना व आरोपीची ओळख पंचनामा यासह ५६ गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे.

एन.डी.,मेघा पानसरे यांनी घेतली पोलिसप्रमुखांची भेट : दोषारोपपत्र सादर होण्यापूर्वी सकाळी ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील, पानसरे यांची स्नूषा मेघा, नातू मल्हार, दिलीप पवार आदींनी जिल्हा पोलिसप्रमुख प्रदिप देशपांडे यांची भेट घेऊन गायकवाड याच्यावरील दोषारोपपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये याची दक्षता पोलिस प्रशासनाने घ्यावी अशी विनंती केली.

समीरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तपासातील विविध बाबींचा आधार घेतला आहे. त्याचबरोबर अज्ञातांविरोधातही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी योग्य बाबींचा समावेश करून चांगल्या प्रकारे दोषारोपपत्र तयार केले आहे. - चंद्रकांत बुधले, सहायक सरकारी वकील, कोल्हापूर.

कलम : कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९/२०-२०१५ भारतीय दंडविधान संहिता कलम ३०२(खून),३०७(खुनाचा प्रयत्न),१२०ब(कट रचणे), ३४(समान हेतू) सह भारतीय हत्यार कायदा कमल ३/२५ ५/२७ (विनापरवाना शस्त्र वापरणे) या कलमान्वये समीर गायकवाड याच्यावर गुन्हा नोंद.

याचा प्रभाव...
४समीर गायकवाड हा सनातन संस्थेच्या प्रचारासाठी पूर्णवेळ साधक आहे. त्याने संस्थेच्या प्रचारासाठी तयार केलेल्या धर्मरथावर चालक म्हणून काम करीत आहे. त्याने क्षात्रधर्म साधना लेखामधील ‘क्षात्रधर्म साधनामध्ये वर्णनानुसार साधना नमूद केल्या. यामध्ये क्षात्रधर्म साधनामध्ये साधकाचे रक्षण व दुर्जनाचा नाश करणे म्हणजे क्षात्रधर्म. तसेच सज्जन व दुर्जन कोणाला म्हणतात, याबाबत दुर्जन म्हणजे रूढ अर्थाने दुर्जन म्हणजे वाईट प्रवृत्तीची व्यक्ती, बुद्धिप्रामाण्यवादी व साधनेला विरोध करणारे.
४पान क्रमांक ३२ वर ‘कृष्णा अर्जुनाला सांगतो की, सर्व कौरव मेलेले आहेत. मी त्यांना मारलेले आहे. दुर्जनांना मारल्यावर दुर्जनांना मारले, असा आपल्याला फुकटचा मोठेपणा मिळणार आहे, असे नमूद आहे. त्याचबरोबर पान क्रमांक ७५ व ७६ वर दुर्जनांचे प्रकार व त्यांना बदलण्यांसाठीचे उपाय दिलेले आहेत. त्यामध्ये दुर्जनांचे तीन प्रकार दिलेले असून, त्यांना बदलण्याचा उपायही दिलेला आहे.
१) दुर्जन म्हणजे-मानसिक पातळीवरचे प्रयत्न व त्याला साधनेला प्रवृत्त करणे
२) मध्यम दुर्जन-शिक्षा (जराशी ते जबरदस्त)
३)अतिशय दुर्जन-नाश (मृत्युदंड)
असे नमूद केले आहे. याचा प्रभाव त्याच्यावर पडला.

जबाबातील माहिती...
प्रतिभानगर येथील चंपालाल भुरमल ओसवाल यांनी १६ फेब्रुवारी २०१५ला सकाळी साडेनऊ वाजता फटाके वाजल्यासारखा चार ते पाचवेळा आवाज आला. गोविंदराव पानसरे व उमा पानसरे यांना जखमी रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळावर पडले असल्याचे सांगितले.
जमीर खुदबुद्दीन शेख (पानसरे यांचा स्वीय सहायक) यांनी, पानसरे हे समाज कार्याबाबत व कम्युनिस्ट पक्षाबाबत माहिती सांगत होते, असे सांगितले.
अ‍ॅस्टर आधारचे वैद्यकीय अधिकारी संजय देशपांडे यांनी गोविंद पानसरे यांचा, तर डॉ. कौस्तुभ वाईकर यांनी उमा पानसरे यांना डोक्याच्या डाव्या बाजूस गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले.
गोविंद पानसरे यांच्यावर फायर झालेल्या गोळीचा मिळालेला पुढील भाग अ‍ॅस्टरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रघुनाथ कांबळे व शिवाजी जानबा शिंदे यांना सिलबंद करून ताब्यात दिला.
मेघा पानसरे, स्मिता, बन्सी सातपुते यांचा जबाब
गोविंद पानसरे यांना रोज सकाळी आनंदराव बाळकृष्ण परुळेकर पेपर वाचवून दाखविण्याचे काम करतात. परुळेकर यांनी दैंनदिन कार्याबाबतची माहिती सांगितलेली आहे.
४प्रतिभानगर येथील अ‍ॅड. मिलिंद दिनकर कदम (रा. एफ-३, अभिनव पार्क) यांनी पानसरे यांच्या कार्याबाबत तसेच धर्मवाद, समाजातील अंधश्रद्धा तसेच सामाजिक व आर्थिक विषमता वाद या विषयावर ते व्याख्यान व लिखाण करीत होते.





असे आहे दोषारोपपत्र...
घटनास्थळावरून संशयित समीर गायकवाड हा दुचाकीवरून गोळ््या झाडून पळून जाताना त्याच परिसरातील एका शाळकरी मुलाने पाहिल्याचा जबाब.
गायकवाड याचे मैत्रिणी ज्योती आनंदराव कांबळे (रा.भांडुप,मुंबई) व अंजली मंगेश झरकर (रा. गजानननगर नाळवडी नाका, ता. जि. बीड सध्या राहणार देवद आश्रम पनवेल) व मित्र सुमित लहू खामणकर रा. नोंदपिरा रोड, शाळा क्रमांक ५ जवळ वणी जि. यवतमाळ यांच्याबरोबर मोबाईलवरील संभाषण.
४त्यामध्ये ‘ज्याला मारायचे आहे, त्याला मारले आहे, आता कोणी शत्रू नाही..’ मी जाऊन येतो, नाशिकच्या कुंभमेळ््याला, लई पापं केली आहेत, डुबक्या मारून येतो, लय नाही, फक्त दोनच केली आहेत.’ असे संभाषण त्याने २७ जून २०१५ ला दोनवेळा व २१ जुलै २०१५ ला केले होते, त्याचा समावेश.
आता पानसरे झाला, आता निखिल वागळेचा करु का..’ असे तो ज्योती कांबळे हिच्याबरोबर १९ जून २०१५ ला मोबाईलवर बोलल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

Web Title: 392 page chargesheet on Sameer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.