पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:58 PM2019-04-09T12:58:02+5:302019-04-09T12:58:28+5:30

यंदा 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचे सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहेत.

Firstly, dedicate your vote to heroic soldiers; Modi's appeal to newly elected voters of lok sabha election | पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं'

पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं'

Next

लातूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवमतदारांना आवाहन करताना चक्क शहीद जवानांचा उल्लेख केला आहे. नवमतदारांनी आपली मत देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करावं, असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले. देशातील निवडणुकांमध्ये जे मतदार यंदा सर्वप्रथम मतदान करत आहेत. हे तेच मतदार आहेत, जे 21 व्या शतकात मतदान करणार आहेत. 21 व्या शतकात देशाचं सरकार निवडणारे हे मतदार आहेत. त्यामुळे 21 व्या शतकात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी मी काही गोष्टी सांगू इच्छितो, असे म्हणत मोदींनी जवानांच्या नावाने मतं मागितलं आहे. 

औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. जवानाच्या बलिदानाचं राजकारण होता कामा नये, सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचं राजकारण होता कामा नये असे नेहमीच बोलते जाते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून देशातील सैन्याचा वापर हा राजकीय मुद्दा बनवून केला जात आहे. तर विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांच्या या मुद्द्याचे राजकारण होत असल्याचे सांगत जुने दाखले दिले जात आहेत. 


लातूर येथील सभेत बोलताना मोदींनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीतून मी आपल्यापुढे ही गोष्ट मांडत असल्याचे म्हटले. आपण नेहमी पाहतो किंवा आपली ती संस्कृती आहे, की आपण आपली पहिली कमाई आपल्या आईजवळ ठेवतो. तसेच आपली पहिली कमाई देवापुढे किंवा आपल्या बहिणीकडे सुपूर्द करतो. त्यामुळे जीवनातील आपलं पहिलं ऐतिहासिक मत आपण पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का ? तुमचं पहिलं मतदान पुलवामामध्ये जे वीर शहीद झाले, त्या शहिदांना तुमचं पहिलं मतदान समर्पित होईल का ? गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचं मत समर्पित होईल का ? असे म्हणत चक्क सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मते मागितली आहेत. आपलं मतदान हे देशासाठी असेल, असेही मोदी म्हणाले. 

दरम्यान, यंदा 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचे सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी या मतदारांना आवाहन करत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमधील जवानांच्या नावाने मतदान मागितले आहे. 


    



 

Web Title: Firstly, dedicate your vote to heroic soldiers; Modi's appeal to newly elected voters of lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.